Unseasonal Rains: अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 14:36 IST2023-03-07T14:33:23+5:302023-03-07T14:36:35+5:30
एकीकडे शेतमालाला भाव नसताना शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे...

Unseasonal Rains: अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
राजुरी (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला. पुणे शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
सोमवारी पहाटे देखील अनेक भागात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर काल दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. अशातच मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता.
जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात राजुरी उंचखडक बेल्हे व आणे पठार भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं डाळिंब फळबागा यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काही ठिकणी गहू कापणी करून ठेवलेला आहे. हरभरा काढलेला आहे. या उत्पादनावर या अवकाळी पावसाचा निश्चितच परिणाम होईल असे सांगितले जाते. या भागात द्राक्ष व डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन महागडी औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. फळबागांवर देखील परिणाम होणार आहे. आंब्याला आलेला मोहोर खाली पडून त्याचा उत्पादनावर परिणाम होईल.