Unseasonal rains : अवकाळी पावसाचा धक्का..! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:31 IST2026-03-28T19:30:59+5:302026-03-28T19:31:07+5:30
परिणामी बाजारात द्राक्षांच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Unseasonal rains : अवकाळी पावसाचा धक्का..! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पुणे : राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोडणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्षबागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात द्राक्षांच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज ३० ते ४० टन आवक होत असते. यंदा हंगाम आधीच उशिराने सुरू झाला होता. डिसेंबरपासून सुरू होणारा हंगाम पावसामुळे महिनाभर पुढे ढकलला गेला. छाटणी उशिरा झाल्याने फळधारणा उशिरा झाली आणि आता तयार झालेल्या पिकावरच पावसाचा घाला बसला. सध्याची परिस्थिती पाहता हंगाम मे-अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात ८०० ते १२०० रुपये प्रतिक्रेट भावाने विक्री होणारी द्राक्षे आता ६०० ते ११०० रुपयांपर्यंत आली आहेत. सांगली, सोलापूर, फलटण, सांगोला, अहिल्यानगर, इंदापूर, बारामती, पारगाव या द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
द्राक्षे निर्यातीतही अडथळे
अवकाळीमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने निर्यातीतही अडचणी वाढल्या आहेत. निर्यातक्षम माल कमी झाल्याने परदेशी बाजारपेठेत मागणी असूनही पुरवठा होत नाही.
अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्षे उत्पादन क्षेत्रात ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. द्राक्षांचे मणी तडकले असून, निर्यातीतही अडचणी आहेत. यामुळे बाजारात माल कमी येत असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी नाराज आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. - अरविंद मोरे, द्राक्ष आडते मार्केटयार्ड