निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट; चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:25 IST2022-01-24T18:25:10+5:302022-01-24T18:25:52+5:30

नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत

uddhav thackeray angry due to election failure said chandrakant Patil | निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट; चंद्रकांत पाटलांचा टोला

निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीवर टीका करून थयथयाट करत आहेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सोमवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

 पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे आधीच्या दसऱ्याच्या भाषणासारखेच होते. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. तब्बल ४१ नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.

 त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगा

आपण हिंदुत्व सोडले नाही असे उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावे. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता पण अण्णासाहेब पाटील महामंडळाला मात्र निधी देत नाही. त्यामुळे  ज्या अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे. त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगावे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.  

पटोले यांना मानसिक तपासणीची गरज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते पाहता पटोले यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे. त्यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा. नाना पटोले यांच्या वृत्तीचा आपण निषेध करतो. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

युतीचा प्रस्ताव नाही 

एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही.

Web Title: uddhav thackeray angry due to election failure said chandrakant Patil