पुण्यात तिहेरी हत्याकांड: प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका धाग्यावरून गूढ उकललं
By किरण शिंदे | Updated: June 7, 2025 18:31 IST2025-06-07T18:29:53+5:302025-06-07T18:31:02+5:30
- तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे.

पुण्यात तिहेरी हत्याकांड: प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका धाग्यावरून गूढ उकललं
रांजणगाव (ता. शिरूर) - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका २५ वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्या मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
अशात आज पुणे ग्रामीण जिल्हा पोलिसांनी एका अत्यंत गूढ हत्याकांडाचा छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीसह गुन्ह्याचे धागेदोरे सुस्पष्ट केले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी रांजणगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या एका शेताच्या हद्दीत एका महिलेसह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग मिळाला.
यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला आहे. पोलिसांनी मृत महिला आणि दोन्ही मुलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, व साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम हाती घेतले. यामध्ये मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय ३५, रा. वाशी, ता. माजलगाव, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले. स्वाती ही बीड जिल्ह्यातील असून तिच्या दोन मुली – स्वराली (वय २ वर्षे) आणि विराज (वय ८ वर्षे) यांच्यासह ती पुण्यात आली होती. पोलिस तपासात उघड झाले की, स्वाती आणि आरोपी गोरख पोपट बांगरे (रा. शिरूर तालुका) यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते.
अधिकच्या माहितीनुसार, स्वाती हिचा खून केल्यावर तिच्या मुलांनाही गोरखने ठार मारले आणि तिघांचेही मृतदेह दुर्गम भागात टाकून दिले. त्यानंतर आरोपी गोरखने घटनास्थळी पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला.
गोरख बांगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास साळुंके, सहाय्यक फौजदार गुलाबराव निमसे, बिट अंमलदार फुलराव यांच्या सहकार्याने करण्यात आला. दरम्यान, गोरख पोपट बांगरे याने स्वातीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि संशयाच्या भरात त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला. पोलिस तपासात पुढे उघड झाले की, घटनेनंतर आरोपीने आपल्या घरात कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती आणि तो शांतपणे वावरत होता.
तत्पूर्वी,पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या प्रभावी नेतृत्वात पुणे ग्रामीण पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट खुनाच्या घटनेचा पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण पोलिस दलाने दाखवलेली तत्परता आणि सखोल तपासामुळे एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.