Pandharpur Wari 2025: यंदा वेळ बदलणार; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रात्री ८ नंतर प्रस्थान होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:11 IST2025-06-09T17:10:52+5:302025-06-09T17:11:26+5:30
Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: प्रस्थान सोहळा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माऊलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय प्रस्थान करता येणार नाही

Pandharpur Wari 2025: यंदा वेळ बदलणार; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रात्री ८ नंतर प्रस्थान होणार
आळंदी: आषाढी पायीसाठी श्री. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान दरवर्षी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान होत असते. मात्र यंदा प्रस्थान सोहळा हा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय पालखीचे प्रस्थान करता येणार नाही. वारकऱ्यांना कष्ट होऊ नयेत आणि पालखी प्रस्थान सोहळ्यास दिरंगाई होऊ नये. यासाठी यंदाच्या वेळी नित्य गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा सूर्यास्तानंतर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काढली जाणार आहे. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम साडेसात वाजता होईल. त्यानंतर मानाच्या ४७ दिंड्या देऊळवाड्यात घेऊन प्रस्थान सोहळ्यास सुरूवात केली जाणार असल्याने माउलींच्या पादुकांचे प्रस्थान रात्री आठनंतर होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.
डॉ. देखणे म्हणाले, “१९ जूनला पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माऊलींचा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी आळंदीत तीन - चार दिवस आधीच दिंड्या, वारकरी, भाविकांची गर्दी शहरात होत असते. दरवर्षी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान साधारण सायंकाळी सहाच्या दरम्यान देउळवाड्यातून होते. मात्र यंदाच्या वर्षी तिथीनुसार सोहळा गुरुवारी येत आहे. त्यामुळे गुरुवारची नित्याची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा लवकर घेण्यात येत आहे. प्रस्थान उशीर होऊन वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आरती झाल्यानंतर महाद्वारातून दिंड्यांना प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी मंदिर प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर प्रस्थानाचा कार्यक्रम सुरू होईल. विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप म्हणाले, आषाढी पायीवारीच्या अनुषंगाने देवस्थानकडून सर्व तयारी सुरु आहे. नित्य परंपरेप्रमाणे प्रस्थान सोहळा हा शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विश्वस्त रोहिणी पवार म्हणाल्या, यंदा रात्री आठनंतर पालखीचा प्रस्थान सोहळा होत असल्याने वारकऱ्यांनी गडबड न करता मंदिर व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.