पुणे : शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीसंदर्भात अद्याप कसलाही प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असे मनसेचे प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले. युती होणार असल्याची चर्चा म्हणजे नुसत्या वावड्या असल्याचे खैरे म्हणाले.
महापालिका निवडणुका लक्षात घेऊन राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसे शिवसेना अशी युती होणार असल्याची चर्चा मागील महिनाभर सुरू आहे. मात्र त्याबाबत ठाकरे बंधूंकडून काहीच हालचाल व्हायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांचे जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होईल हे व राज यांचे, हो, मी मातोश्रीकडे निघालो आहे हे अशा दोन्ही वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चेला जोर आला आहे.
मनसेचे प्रदेश प्रवक्ते खैरे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की राज यांनी त्यांच्या मिश्कील स्वभावाप्रमाणे गाडीतून बाहेर पाहत, मी मातोश्रीकडे चाललो आहे असे सांगितले. युती व्हायची असेल तर शिवसेनेकडून तसा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र असा एकही प्रस्ताव वगैरे शिवसेनेकडून आलेला नाही. प्रदेश प्रवक्ता म्हणून हे जबाबदारीने बोलत आहे, असे खैरे म्हणाले.
राज्यात यासंबधी चर्चा सुरू आहे, मात्र त्या नुसत्या वावड्या आहेत. शिवसेनेकडून युतीबाबतचा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. तसा तो अजून तरी आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे त्यावर निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, सध्या तरी तसे काहीच नाही, असे खैरे म्हणाले.
मागील काही निवडणुकांमध्ये शिवसेना, मनसेला अपयश मिळाले आहे. त्यामुळेच आता एकत्र येऊन राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक लढवावी असे मनसे व शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या फक्त कार्यकर्त्यांचेच नाही तर प्रमुख पदाधिकाऱ्यांचेही मत आहे. मात्र राज किंवा उद्धव यावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. मात्र त्यांच्याच काही सुचक विधानांचा आधार घेत दोघे एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे.