बदलाची प्रक्रिया सुरू, आता महापालिकेवर बोला - हर्षवर्धन सपकाळ
By राजू इनामदार | Updated: June 19, 2025 20:53 IST2025-06-19T20:51:08+5:302025-06-19T20:53:11+5:30
नेतृत्वबदलाच्या मागणीवरून सध्या शहर काँग्रेसमध्ये जोरदार गटबाजी सुरू आहे. विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची तीन वर्षांची मुदत संपली.

बदलाची प्रक्रिया सुरू, आता महापालिकेवर बोला - हर्षवर्धन सपकाळ
पुणे : ‘निरीक्षक म्हणून नेमलेले सतेज पाटील आता इथे नाहीत, त्यांचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे शहरातील नेतृत्वबदलावर आता बोलू नका. महापालिका निवडणुकीचा विषय आहे त्यावरच बोला,’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले. त्यामुळे नेतृत्वबदलाचा विषय अंधातरीच असल्याचे स्पष्ट झाले.
नेतृत्वबदलाच्या मागणीवरून सध्या शहर काँग्रेसमध्ये जोरदार गटबाजी सुरू आहे. विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची तीन वर्षांची मुदत संपली. मात्र, महापालिका निवडणूक लक्षात घेऊन त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे, तर त्यांच्याच कार्यकाळात पक्षाची अवस्था बिकट झाली, पक्षसंघटना लयाला गेली. त्यामुळे लोकसभा, विधानसभेनंतर आता महापालिकेत पुन्हा पराभव पाहायचा नसेल तर त्वरित नेतृत्व बदल करावा, अशी दुसऱ्या गटाची मागणी आहे.
वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी म्हणून प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांचा दोन वेळा पुणे शहराचा दौरा झाला. मात्र, त्यानंतरचा अहवालच त्यांनी अद्याप प्रदेशाध्यक्षांना सादर केलेला नाही. गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. पुण्यातून या बैठकीला शहराध्यक्ष शिंदे, शहर सरचिटणीस अजित दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अनंत गाडगीळ, दीप्ती चौधरी, अभय छाजेड, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, बाळासाहेब धाबेकर, रफिक शेख, अविनाश बागवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच शहरातील नेतृत्वबदलाचा विषय निघाला. त्यावर सपकाळ यांनी ती प्रक्रिया सुरू आहे, त्याविषयी आता बोलू नका, महापालिका निवडणूक नियोजनावर बोलू, असे सांगितले. त्यामुळे या विषयावर काहीच चर्चा झाली नाही. पक्ष संघटनेची विशिष्ट रचना आहे. त्यात ब्लॉक समिती, त्यांचे पदाधिकारी ही तळाची रचना आहे. ती प्रत्येक ब्लॉकमध्ये व्हावी, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी म्हणून लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, दोन्ही बाजूंनी आपली तयारी असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने सज्ज राहण्याविषयी सपकाळ यांनी पुण्यातील नेत्यांना सांगितले.
लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा शहरात सातत्याने पराभव होत आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसला गेल्या काही वर्षांत विजयाचा गुलाल लागलेला नाही. संघटना क्षीण झाल्याची टीका यावरून सातत्याने पक्षातीलच नेते करत असतात. त्यातूनच मग नेतृत्वबदल करण्याची मागणी होत आहे.