Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:52 IST2025-01-20T17:51:24+5:302025-01-20T17:52:20+5:30
पीएमपीच्या निम्मेसुद्धा बस धावत नसल्याने नागरिक दुचाकी आणि चारचाकी वापरासाठी बाहेर काढतात, त्यामुळे बऱ्याच वेळा ट्राफिक होते

Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार?
पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पीएमपीची वाहतूक सेवा सुरळीत आणि प्रवासी केंद्रित होण्यासाठी ४ हजार ५०० बसची आवश्यक असल्याचे इन्स्टिट्यूट फार ट्रन्सपोर्ट अॅड डेव्हलपमेंट (आयटीडीपी) या संस्थेने सांगितले आहे.
पुण्यासह मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर व इतर महानगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या याबाबत (आयटीडीपी)च्या वतीने सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याकरिता शहरातील वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेला या गाड्या तत्काळ उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयटीडीपीने नुकत्याच केलेल्या विश्लेषणात राज्यातील शहरी भागांमध्ये सार्वजनिक बसबसेची कमतरता असल्याचे म्हटले आहे. राज्यात शहरी भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जवळपास २८ हजार ८०० बसगाड्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
पुण्यात केवळ दोन गाड्या..
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडी हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते. वाढत्या शहरीकरणामुळे पीएमपीची सेवा देण्याचे क्षेत्र वाढत असताना, तुलनेने गाड्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा भार पीएमपीवर पडत आहे. आयटीडीपीने केलेल्या सर्व्हेतून पुण्यासाठी ४ हजार ५०० बसची आवश्यकता आहे. त्या तुलनेत पीएमपीच्या निम्मेसुद्धा बस धावत नाही. यामुळे अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी वापरासाठी बाहेर काढतात. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होते. शिवाय १० किलोमीटरसाठी एक तास रस्त्यामध्ये अडकून पडावे लागते. यामुळे पीएमपीच्या बस गाड्या वाढवणे गरजेचे आहे.
शहरांत बससेवांचा अभाव
'आयटीडीपी'ने डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रातील शहरी भागांच्या सार्वजनिक वाहतूक गरजांचे मूल्यांकन केले होते. केंद्र सरकारच्या २०१२ मध्ये सादर केलेल्या १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या शिफारशीनुसार, २ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये संघटित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. सध्या १४ शहरांमध्ये पालिकांमार्फत बससेवा आहे. ३० शहरे सार्वजनिक बससेवांपासून वंचित आहेत.
शहरानुसार बसची आवश्यता
शहर उपलब्ध बस अपेक्षित बस
पुणे २००० ४५००
मुंबई ३६०० ८०००