शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 13:14 IST2019-09-05T13:11:38+5:302019-09-05T13:14:16+5:30
‘असामान्यत्वाचा ध्यास घे, असा आत्मविश्वास गुरू आणि आईने भरल्याने मिळाले यश, स्वप्न उतरले सत्यात

शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर
पिंपरी : इयत्ता दहावीत असताना आयएएस बनण्याचे स्वप्न पाहिले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर वाटचाल केली आहे. सुरुवातीला इंजिनिअरिंग केले. नोकरी केली. नियोजनबद्धपणे अभ्यास केला आणि आयएएसमध्ये देशात सातव्या क्रमांकावर यश मिळाले. इंजिनिअरिंग ते सनदी अधिकारी अर्थात आयएएस पदापर्यंतची श्रावण हर्डीकर यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. आयुष्यात ध्येय छोटे असू नये, असामान्यत्वाचा ध्यास घे, असा आत्मविश्वास
माझी आई आणि गुरू डॉ. भाग्यश्री यांनी माझ्यात भरला. कठोर परिश्रम करून मी ध्येयाकडे वाटचाल केली आणि यश मिळाले. आयएएस झालो, असे सांगत होते, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर.
आयुष्यात शिक्षक म्हणजेच गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरूंनी दिलेल्या वाटेवरून चालल्यास आयुष्यात हमखास यशस्वी होता येते त्यामुळे तरुणांनी गुरूंचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करावी. यश निश्चित मिळते. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
......
प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी व्यक्तिमत्त्व पूरक असून हे संस्कार शालेय जीवनात झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय सेवेत भविष्य घडविण्याच्या संधी तरुणांपुढे उपलब्ध आहेत. राज्यसेवा आयोग किंवा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी ध्येयनिश्चिती, स्वत: वरील अढळ विश्वास, नियोजनबद्ध आणि गुणात्मक अभ्यास, चिकाटी असल्यास हमखासपणे स्पर्धा परीक्षेत यश मिळते, उत्तम प्रशासक होण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्त्व हवे आहे, असा यशाचा मंत्र ‘मन मै है विश्वास, हम होंगे कामयाब...’ असा स्वत:वर अढळ विश्वास, विचारांची सुस्पष्टता असेल तर कोणतीही परीक्षा अवघड नसल्याचेही त्यांनी सांगितले.
......
आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील मार्गदर्शन मोलाचे...
माझी आई डॉ. भाग्यश्री या प्राध्यापिका आहेत. त्यांच माझ्या पहिल्या गुरू आहेत. मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी योग्य वेळी केलेले मार्गदर्शन आयुष्य घडविण्यास फलदायी ठरले. शालेय जीवनातील संस्कार जीवन बदलविण्यासाठी पूरक ठरतात. आयुष्यात ध्येय छोटे असू नये, असामान्यत्वाचा ध्यास घे, असे ध्येय आणि ध्यास त्यांनी माझ्यात भरला. त्यामुळेच यश मिळविणे सोपे झाले.
.............
दिवसात सोळा ते सतरा तास अभ्यास सुरू झाला. पब्लिक अॅडमिनिर्स्टेशन आणि मराठी साहित्य हे माझे आवडीचे विषय. नियोजनबद्ध अभ्यास, जिद्द, चिकाटीने यश मिळविले. कस्टमस अँड सेंट्रल एक्साईज सर्व्हिस यामध्ये देशात २३७ वी रँक मिळाली. त्यानंतर पुन्हा जोमाने प्रयत्न केले. आयएएसमध्ये देशात सातवा आलो. तो आनंद काही औरच होता. स्पर्धा परीक्षा असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात भवितव्य घडविणे असो, अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये, स्वत:वर अढळ विश्वास ठेवून वाटचाल केली.
.............
विचार, संस्कार हृदयात रूजल्याने वाटचाल सुकर
डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरात माझे शिक्षण झाले. त्या वेळी अनुराधा पळधे यांनी नेतृत्व गुण कसे असावेत, यासाठी संस्कार केले. पुढे या संस्कारांमुळेच उत्तम अधिकारी बनण्याबरोबरच, स्वत:मधील कलावंत, कलारसिक आणि खेळाडूही जिवंत राहिला आहे. युपीएससी करीत असताना सुभाष सोमन सरांमुळे साहित्य आणि मराठीत रस निर्माण झाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे युपीएससीकडे आकुष्ट झालो. त्यातून व्यक्तिमत्त्व घडले.