तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 15:40 IST2020-04-06T15:38:48+5:302020-04-06T15:40:42+5:30
तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे..

तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी
पुणे : तबलिगीला ट्रिटमेंट कसली देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे; असे वक्तव्य मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केल्यामुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिगी जमातने ताबडतोब तोबानामा(माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केली आहे.
यांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी म्हणाले,दिल्लीच्या निजामुद्दिन, मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. यातच तबलिगीच्या वर्तनाचा समाचार घेत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत असल्याामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.मुख्यमंत्री मा. उघ्दवजी ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पुन:श्च मुस्लिम समाजात भीती निर्माण झाली आहे.
येत्या बुधवारी (8 एप्रिल) शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिद मध्येनमाज आदा करतात आणि कबरस्थानात जाऊन प्रार्थना करीत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लिम समाजात रमजानला फार महत्व असते.महिनाभर उपास, नमाज, कुराण पठण केले जाते. ईदगाहवर जाऊन सामुदायिक नमाज अदा करण्याबरोबरच आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट - अलिंगन दिले जाते. हे सर्व कोरोना विषाणू पसरवण्यात आणि ग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवावेत. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन डॉ. तांबोळी यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------