सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 09:07 IST2022-09-13T09:06:40+5:302022-09-13T09:07:15+5:30

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी....

Supriya Sule said It has been two and a half months since the change of government, but the district still does not have a Guardian Minister | सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

सरकार बदलून अडीच महिने झाले पण जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

नीरा (पुणे) : "मागील आठवड्यात पावसाने पुरंदरला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. मविआचे सरकार अशा बाबतीत तातडीने मदत करीत होतं. सत्ता ओरबाडून घेतली. मात्र, कामाची सुरुवात होताना दिसत नाही. अडीच महिने झाले सरकार बदललं. पण, अजून पालकमंत्री नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण - पूर्व पट्टयात मुसळधार पाऊस झाल्याने गुळूंचे, राख, रणवरेवाडी, कर्नलवाडी या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. या दरम्यान सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे सोमवार (दि. १२) रोजी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची सुप्रिया सुळेंनी पाहणी केली. पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, झिरीपवस्ती, गुळुंचे, थोपटेवाडी, नीरा या गावांसह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेताला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, विजयराव कोलते, संभाजीराव झेंडे, माणिकराव झेंडे, विराज काकडे, पृथ्वीराज निगडे, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, बापुराव भोसले, नंदकुमार निगडे, ज्ञानदेव निगडे, दीपक भोसले, बाळासाहेब निगडे, रघुनाथ शेंद्रे आदी उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री यांना विनंती करते, जर एका दिवसात २० मंडळांच्या गणपतीला गेलात तसा एक दिवस आम्हाला द्या. आम्ही २० गावांत त्यांना नेतो. महाराष्ट्रात आता २ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री हवे आहेत. एक कार्यकर्त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करतील.

Web Title: Supriya Sule said It has been two and a half months since the change of government, but the district still does not have a Guardian Minister