आपण ही निवडणूक कशी जिंकली याची चर्चा करणे बंद करा; चंद्रकांत पाटलांची मसापच्या कार्यकारिणीला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:42 IST2026-03-23T11:42:38+5:302026-03-23T11:42:59+5:30
सत्ताधाऱ्यांनी संघाचे काय काम? असा प्रचार सुरू केला. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे रसायन काय आहे याची कल्पनाच त्यांना नव्हती

आपण ही निवडणूक कशी जिंकली याची चर्चा करणे बंद करा; चंद्रकांत पाटलांची मसापच्या कार्यकारिणीला सूचना
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक संपली त्याला आठवडा होऊन गेला. आता आपण ही निवडणूक कशी जिंकली, याची चर्चा करणे बंद करा. ज्या कारणासाठी जिंकलो त्याचा आराखडा तयार करून त्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला केली. म्हणजे पाच वर्षांनंतर ही निवडणूक जिंकणे इतके अवघड होणार नाही, असे काम आपल्याला करावयाचे आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या स्नेहमेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, डाॅ. नितीन संगमनेरकर यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते.
तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी संघ या निवडणुकीत उतरला असून, संघाचे काय काम? असा प्रचार सुरू केला. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे रसायन काय आहे याची कल्पनाच सत्ताधाऱ्यांना नव्हती. या रचनेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे आधी स्वयंसेवक मग मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्री असतात. संघ काही करणार नाही सर्व होणार आहे,’ या तत्त्वानुसार ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक जिंकण्यात यश मिळाले, असेही पाटील म्हणाले.
पांडे म्हणाले, ध्येयवादाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी अनेकांना मसाप म्हणजे काय, उमेदवार कोण हे माहिती नव्हते. त्यांना शंभराव्या संमेलनाकडून व्यक्तिगत काही अपेक्षा नाहीत. मतदार यादीतील साडेसहा हजार मतदारांचे पत्ते चुकीचे होते. म्हणजे आपल्या हातामध्ये दहा हजार मतदान होते. ही संस्था कोणा व्यक्तीची नाही, तर मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. मिळालेले यश हा सामूहिक शक्तीचा आविष्कार आहे. धनंजय कुलकर्णी, शशांक महाजन, विजय शेंडगे यांनी संघर्ष केला. न्यायालयात दाद मिळाली नाही. आता भांडायचे नाही तर ताब्यात घ्यायचे अशी परवानगी चंद्रकांतदादांकडून घेतली. आता चांगले काम करण्याचा संकल्प करूयात.
सोमण म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच त्यांना कार्यान्वित करण्याचे काम राजेश पांडे यांनी केले. फार मोठी जबाबदारी आली याची जाणीव आहे. १००वे अखिल भारतीय मराठी संमेलन उत्तम करायचे यात शंका नाही. पण, कसे करतात बघू, असे म्हणणारे लोकही आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे संमेलन देदीप्यमान आणि ‘न भूतो’ करायचे आहे. भविष्याबद्दल सांगता येत नाही. त्यामुळे ‘न भविष्यति’ असे आजतरी म्हणायला नको.