उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाचा दिलासा; 'ही' भाडेवाढ रद्द होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:22 IST2025-07-25T10:22:30+5:302025-07-25T10:22:52+5:30
एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ आकारण्यात आली होती

उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाचा दिलासा; 'ही' भाडेवाढ रद्द होणार
पुणे : गौरी, गणपती उत्सवासाठी लाखो नागरिक कोकणात जातात. या काळात अनेक प्रवाशांकडून एक बस बुक करण्यात येते. परंतु, गेल्या वर्षी गणपतीला जाणाऱ्या नागरिकांकडून एकेरी वाहतूक होत असल्याने ३० टक्के जादा भाडे आकारण्याचा निर्णय झाला होता. परंतु, एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गेली ७७ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आहे. सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू आहेत. परंतु, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण, उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणांहून बस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो. तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाइलाजाने घेतला होता. परंतु यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे, असे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले आहे.