दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परतले; अजून ९० जणांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 20:22 IST2026-03-05T20:20:45+5:302026-03-05T20:22:29+5:30
दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परतले; अजून ९० जणांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु
पुणे : दुबई अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे अडीचशे नागरिकांपैकी आतापर्यंत १२८ नागरिक सुखरूप पुण्यात परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण २४६ नागरिक दुबई येथे गेले होते. त्यापैकी बुधवारी १११ नागरिक पुण्यात परतले होते. गुरुवारी आणखी १७ नागरिक पुण्यात पोहोचले असून आतापर्यंत एकूण १२८ नागरिक सुखरूप परतले असल्याची माहिती डुडी यांनी दिली.
दरम्यान, २८ नागरिकांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक पुनर्नियोजित करण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उर्वरित ९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्याबाबत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक समन्वय सुरू असल्याचेही डुडी यांनी सांगितले. दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.