लाडकी बहीण योजनेच्या यशामागे शिवराजसिंह चौहान, अजित पवार थेटच बोलले...
By नितीन चौधरी | Updated: June 3, 2025 19:28 IST2025-06-03T19:27:48+5:302025-06-03T19:28:27+5:30
या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले.

लाडकी बहीण योजनेच्या यशामागे शिवराजसिंह चौहान, अजित पवार थेटच बोलले...
पुणे : मध्य प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या ‘लाडली बहन’ योजनेने आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. ही आजवरचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आम्ही चौहान यांचे आभारी आहोत, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुण्यात आयोजित पहिल्या ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘या योजनेमुळे महिलांनी भरभरून प्रेम दिले. आमच्या मतपेट्या मतांनी भरभरून वाहिल्या. परिणामी, विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले आहे.’
शिवराजसिंह चौहान यांचे विशेष आभार मानत, त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला मतदारांची मने जिंकण्याचा मार्ग दाखवला. आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ही योजना राबवली आणि त्यातून मतदारांचा विश्वास मिळविला. त्यामुळेच हे यश शक्य झाले. आम्हाला विजयाचा मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो,’ अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चौहान म्हणाले, ‘ही योजना माझी नाही, ती तुमचीच आहे. याबाबत मी राज्य सरकारला धन्यवाद देईन. त्यांनी गरीब बहिणींचे दु:ख समजून घेतले. हजार दोन हजारांसाठी त्यांना अडचणी येत होत्या. या योजनेतून त्यांना मदत करण्यात आली. मध्य प्रदेशात लाडकी लक्ष्मीपासून लाडकी बहीणपर्यंतचा प्रवास महिला सशक्तीकरणाचा आहे. मात्र, महाराष्ट्राने केलेल्या अनेक कामांचा अवलंब अन्य राज्ये करत आहेत. दुसऱ्यांकडील एखादे काम चांगले असल्यास महाराष्ट्रात अवलंब केला जातो.’