छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:09 IST2025-05-02T19:08:32+5:302025-05-02T19:09:34+5:30
उमेदवार यादीत कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नसल्याने निवडणुकीतून बाहेर पडत शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे

छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर
बारामती : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या हितासाठी आम्ही पृथ्वीराज जाचक यांना ‘ओपन’ पाठिंबा दिला. ज्या विश्वासाने पाठींबा दिला. मात्र सर्वपक्षीय पॅनल करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र,ते सर्वपक्षीय पॅनल कुठेही दिसत नाही. उमेदवार यादीत आमच्या पक्षातील कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नाही. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोणताही सहभाग घेणार नाही.तसेच तटस्थ भूमिका घेऊन छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि २) जाहीर केली. या पार्श्वभूमीवर ॲड तेजसिंह पाटील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांची खदखद व्यक्त केली. यावेळी ॲड पाटील म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी सर्वपक्षीय सभेत आम्ही सहभागी झालो. हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व श्रीनिवास पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. मात्र, सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चद्र पवार पक्षाच्या एकाही उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. होणाऱ्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या सभा, प्रचारात आमचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत. आम्ही कोणाच्या बाजूने अथवा विरोधात प्रचार देखील करणार नाही. या निवडणुकीत तटस्थ भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मात्र मतदान करताना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून योग्य उमेदवारांना आम्ही मतदान करणार असल्याचे ॲड पाटील यांनी स्पष्ट केले.