पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:27 IST2025-05-09T10:26:53+5:302025-05-09T10:27:12+5:30
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे

पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त
पुणे : पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत भाविकांची गर्दी असणारे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
भारत आणि पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात देखील आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरच आपण बघतोय की, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आलं आहे. काल रात्रीपासूनच पुणे शहरामध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे. त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अनेकदा उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. त्या प्राप्त झालेल्या असल्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली होती. पोलीस आणि सैन्य देखील काही प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेलं होतं. रोज हजारोच्या संख्येने नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जी परिस्थिती सध्या भारत पाकिस्तानमध्ये तिचा कुठलाही परिणाम याठिकाणी होऊ नये या पार्श्वभूमीवरती आता सैन्य तैनात करण्यात आले आहेत. सुवर्ण मंदिराच्या वर देखील हल्ला करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा होता आणि तो भारतीय सैन्याने हाणून पाडलेला आहे. सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या कामी असल्याचं देखील दिसून येत आहे.
खरंतर कुठल्याही पद्धतीने घाबरून जाण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारच्या सूचना देखील जारी करण्यात आलेल्या आहेत. सरकारकडून आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका फक्त आणि फक्त प्रशासन असेल किंवा सरकारच्या सूचना फॉलो करा असं नागरिकांना सांगण्यात आलेले आहे.