एक मोहीम 'आरोग्यदायी' हवेसाठी; राज्यात '#saalbhar60'चळवळीद्वारे अनेकजण एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:54 IST2020-06-08T17:23:29+5:302020-06-08T17:54:08+5:30
लॉकडाऊनमध्ये हवा प्रदूषणमुक्त; हीच स्थिती कायम ठेवण्याची गरज

एक मोहीम 'आरोग्यदायी' हवेसाठी; राज्यात '#saalbhar60'चळवळीद्वारे अनेकजण एकत्र
पुणे : लॉकडाऊनमध्ये निसर्ग प्रदूषणमुक्त झाला आहे. तो तसाच वर्षभर राहावा, यासाठी आता मोहिम सुरू झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या #saalbhar60 या डिजिटल उपक्रमामध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरातील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. प्रदूषणयुक्त हवेशिवाय आरोग्यदायी श्वास घेता यावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचाही समावेश सीपीसीबीच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये आहे. म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्ड्सच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये हा समावेश होतो आणि येथील वायू प्रदुषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ही मोहिम आवश्यक आहे.
वायू प्रदुषणावर संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन (इंडिया)चे संचालक सरथ गुट्टीकुंडा म्हणाले, आपल्याला वायू प्रदुषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण ही स्रोते स्वच्छ रहावीत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे.
#saalbhar60मोहिमेबद्दल....
लॉकडाऊनच्या ६०व्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हरिद्वारमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता रिधिमा पांडे हिने या मोहिमेचा व्हिडीओ तयार केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी 'सर्वांसाठी स्वच्छ हवा' अशी मागणी करणारे फोटोज शेअर करून वर्षभर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळावी अशी ती मागणी करीत आहे.
संक्षिप्त रूप :
स्रे 2.5 : २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण
स्रे10: १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण
==============
पुणे लॉकडाऊनच्या ३० दिवस अगोदर १ २ ३ ४
स्रे 2.5 : ५४.८ २३.२ २१.३ २१.२ २१.४
स्रे10: 91.4 37.2 34.1 33.9 35.8
===============================
कोविडमुळे सर्व बंद झाले आणि हवा, पाणी, नदीत सुधारणा झाली. आता सर्व स्वच्छ झालंय, पण त्यावर फक्त चर्चा करून उपयोग नाही. हे स्वच्छ निसर्ग आता जपायला हवा. त्यासाठी काही हालचाल करायला हवी. म्हणून 'हॅशटॅगसालभर६०' ही मोहिम सुरू आहे. शहरी जीवनात वाहनांचे प्रदूषण वाढतेय. सार्वजनिक वाहतूकीचा वापर केला, तर प्रदूषण कमी होईल. रस्त्यांसाठी झाडं कापली जातात. पण रस्ता बांधून वाहतूक सुरळीत होत नाही. यामध्ये मुळात आपणच शाश्वत उपाय करायला हवेत. काही रस्ते मोठे हवेत. कशाला हवेत ? रस्ते मोठे की गाड्या तुंबणार नाहीत का ? याऐवजी सार्वजनिक वाहतुक वापरा आणि वैैयक्तिक वाहने रस्त्यावर कमी आणायला हवीत. सायकल वापरणे खूप चांगला उपाय आहे.
- सुजीत पटवर्धन, विश्वस्त, परिसर
===========================
देशात दरवर्षी पावणेदोन लाख बालकांचा मृत्यू
देशातील प्रदूषणामुळे गतवर्षी १ लाख ८५ हजार ४२३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद सेंटर ऑफ सायन्स अॅँड एन्व्हायरमेंट या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात आहे. हे मृत्यू फुप्फुसात धुलीकणांचे बारीक कण जाऊन झालेल्या संक्रमणामुळे झाले आहेत. पीएम२.५ चे कण म्हणजे आपल्या एका केसाचा जेवढा व्यास असतो, त्याच्या ५० ते ७० मायक्रोनचा कण म्हणजे पीएम२.५ होय. हे कण वाहनातील धूर, धातूचे बारीक कण, जैैविक घटकांतून येतात. हे कण श्वसन संस्थेला नुकसान पोचवतात. म्हणून वाहनांची संख्या कमी झाली तर हे कण कमी होतील.