धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढला पावसाचा जोर
By Admin | Updated: July 17, 2014 03:11 IST2014-07-17T03:11:43+5:302014-07-17T03:11:43+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांत तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढला पावसाचा जोर
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांत तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. याशिवाय या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसास सुरुवात झाली असून, शून्यावर पाणीसाठा गेलेल्या वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांत १२ ते १६ जुलै या पाच दिवसांत तब्बल ४५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे १२ जुलै रोजी असलेल्या १.०७ टीमसी पाणीसाठा १६ जुलैअखेर १.७० टीएमसीवर पोहोचल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
गेली महिनाभर पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यामुळे शहरावर दिवसाआड पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, या पावसाने पाणीसाठ्यात अर्धा टीएमसी पाणी वाढले आहे. पावसाचा हा जोर अद्यापही कायम असून, या पावसाने शून्यावर पाणीसाठा असलेल्या वरसगाव व टेमघर धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली
आहे. (प्रतिनिधी)