राहुल गांधींचे बदनामीकारक विधान प्रकरण; सावरकरांच्या ब्रिटिश काळातील पत्रव्यवहारावर टीका झाल्याची फिर्यादीची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:37 IST2026-04-01T13:31:13+5:302026-04-01T13:37:45+5:30
उलटतपासणी दरम्यान, लंडन येथे ज्या दिवशी राहुल गांधी यांचे भाषण झाले त्या दिवशी राहुल गांधी खासदार होते की नाही याची खातरजमा केलेली नाही.

राहुल गांधींचे बदनामीकारक विधान प्रकरण; सावरकरांच्या ब्रिटिश काळातील पत्रव्यवहारावर टीका झाल्याची फिर्यादीची कबुली
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश काळात सरकारबरोबर जो पत्रव्यवहार केला. त्यावर अनेकांकडून टीका-टिप्पणी करण्यात आली असल्याचे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी दिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रकरणात उलट तपासादरम्यान ॲड. पवार यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्या उलटतपासात साक्षीदार सात्यकी सावरकर यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी मान्य केल्या.
उलटतपासणी दरम्यान, लंडन येथे ज्या दिवशी राहुल गांधी यांचे भाषण झाले त्या दिवशी राहुल गांधी खासदार होते की नाही याची खातरजमा केलेली नाही. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखनावर व विचारांवर अनेक राजकीय नेते सार्वजनिकरीत्या टीका-टिप्पणी करतात हे मान्य असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले. त्या भाषणावेळी लंडनमध्ये तेथील स्थानिक पत्रकार उपस्थित होते की नाही याची माहितीही नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी प्रत्यक्षात लंडनला गेले होते की नाही, याबाबत विश्रामबाग पोलिसांकडून कोणताही तपास झाला की नाही,तसेच भारतातील कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिन्यांवर या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली की नाही याबाबतही त्यांना माहिती नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदाजे ३५ पुस्तके लिहिली आहेत; मात्र इतर देशातील व विदेशातील लेखकांनी या विषयावर किती पुस्तके लिहिली याची त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. तसेच विनायक दामोदर सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणण्याबाबत देखील अनेक वेळा टीका-टिप्पणी झाल्याचे त्यांनी मान्य केले. उलट तपासा दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांनंतर न्यायालयाने खटल्याचे कामकाज तहकूब केले असून, पुढील उलटतपास दि. ८ एप्रिल रोजी होणार आहे.