Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले गिरे पराभूत; आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:44 IST2026-02-09T13:44:26+5:302026-02-09T13:44:59+5:30
Pune ZP Election Result 2026 निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती

Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले गिरे पराभूत; आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील विजयी
मंचर: जिल्हा परिषदेच्या दोन उपाध्यक्षांच्या लढतीत पारगाव जारकरवाडी गटात माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा 2600 हून अधिक मतांनी पराभव केला आहे.
पारगाव जारकरवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये हायव्होल्टेज लढत झाली. निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माजीमंत्री वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. या गटामध्ये निवडणुकीचा प्रचार रंगला होता.निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा पक्ष यांनी एकत्रित येत एकच उमेदवार दिल्याने एकास एक लढत झाली. भाजपचा उमेदवार रिंगणात होता मात्र त्याची कामगिरी समाधानकारक झाली नाही. विवेक वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पारगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाने वातावरण निर्मिती झाली होती. शिवसेनेने विवेक वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी मोठा जोर लावला होता. असे असतानाही वळसे पाटील यांनी एकहाती विजय मिळविला आहे. माजीमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रचाराला आले नव्हते. त्यावेळी प्रचाराची धुरा म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांभाळली. विवेक वळसे पाटील यांना जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने आंबेगाव तालुक्यात घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या तब्बल आठ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या असून तीन पक्षाच्या आघाडीला जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.