जिद्दीला यशाची साथ..! अकाेल्याची रेणुका पुण्यात आली अन् दिव्यांगत्वावर मात करत ‘यूपीएससी’त उत्तीर्ण झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:28 IST2026-03-08T12:22:25+5:302026-03-08T12:28:39+5:30
- रेणुका ही मूळची अकाेला जिल्ह्यातील पातूर गावची. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण असले तरी श्रवणदोष पाचवीला पूजलेला.

जिद्दीला यशाची साथ..! अकाेल्याची रेणुका पुण्यात आली अन् दिव्यांगत्वावर मात करत ‘यूपीएससी’त उत्तीर्ण झाली
- उद्धव धुमाळे
पुणे : प्रबळ इच्छाशक्ती अन् कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला तुमच्या यशापासून कुणीच राेखू शकत नाही, हेच रेणुका केकण या विद्यार्थिनीने कृतीतून सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत रेणुकाने ९४८ वी रॅंक मिळवत अधिकारी हाेण्याचे स्वप्न साकार केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून काैतुक हाेत आहे.
रेणुका ही मूळची अकाेला जिल्ह्यातील पातूर गावची. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण असले तरी श्रवणदोष पाचवीला पूजलेला. त्यामुळे स्वप्नांना गवसणी घालण्यात अनेक अडथळे उभे, तरीही जिद्द पक्की. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ते झेलण्याची तयारी बाळगलेली. त्यामुळे रेणुकाने बारावी पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा चंग बांधला आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय गाठले. येथे ‘बीए’चे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुढे २०२२ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या स्पप्नांच्या दिशेने झेप घेत २०२२ पासून पुण्यातील कात्रजमध्ये कार्यरत मनाेबल संस्थेत स्वत:ला दाखल करून घेतले. अभ्यास चांगला, त्यासाठीची तयारी कसून केलेली, पण मुलाखतीला सामाेरे जाताना समाेरचे जे प्रश्न विचारतील ते आपल्याला अचूकपणे कळेल का? हा एकच प्रश्न मनात घरं केलेला. ही भीती घालवण्याचे काम ‘मनाेबल’ संस्थेने केले आणि रेणुकाचे मनाेबल वाढले. यासाठी संस्थेत लिपी रीडिंग करून समाेरच्याने विचारलेले प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टीने रेणुकाची विशेष तयारी करून घेण्यात आली. व्हिडीओला सबटायटल दिले आणि ते पाहून, ऐकून अभ्यास करायला लावले. यामुळे रेणुकाचा आत्मविश्वास बळावला अन् तिने स्वप्न साकार करून दाखवले.
मी २०२३ पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेली आहे. येथे निवासी विद्यार्थी म्हणून तयारी करत होते. येथे मला वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि सतत प्रेरणा देणारे शैक्षणिक पाठबळ मिळाले. त्यामुळेच यूपीएससी परीक्षेत प्रत्येक टप्पा पार करून यशाला गवसणी घालू शकले. - रेणुका केकण, यूपीएससी उत्तीर्ण
‘मनोबल’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सुलभ अध्ययन साहित्य, विशेष अध्यापन पद्धती आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे त्यांना स्पर्धेत सक्षमपणे स्पर्धा करता आली. योग्य संधी, आधार आणि व्यवस्था उपलब्ध झाली तर दिव्यांग विद्यार्थीही सर्वोच्च स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवू शकतात, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. - मिलिंद पाटील, विभागप्रमुख, मनोबल पुणे