महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:15 IST2025-04-11T10:15:06+5:302025-04-11T10:15:55+5:30
महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती

महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'
पुणे - महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण करून दिली. या महापुरुषांच्या आदर्शांपुढे वाटचाल करत जातीय सलोखा वाढवायचा आहे. असं सांगत त्यांनी फुले वाडा परिसरातील स्मारक उभारणीसंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं.
पवार म्हणाले,'फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा घेऊन एक प्रेरणादायी स्मारक उभारायचं आहे. यासाठी पुणे महापालिका आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. यात कुठलही राजकारण आणायचं कारण नाही. ज्यांच्या जागा घेतल्या जातील, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी, काही वेदना होतातच. पण समाजाच्या हितासाठी हे पाऊल आवश्यक आहे. पुढील जयंतीपर्यंत यामध्ये मोठा फरक दिसून येईल.
दरम्यान, महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. जमीन अधिग्रहणात पालिका अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. मी सरकारमधील घटक पक्षाचा आमदार असलो तरी उपोषण करायला मोकळा आहे. असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमधून स्पष्ट होतं की, फुले वाड्याच्या विकासासाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी दोघंही गंभीर आहेत, मात्र अंमलबजावणीसाठी प्रशासनाने गती देण्याची गरज आहे.
यावेळी अजित पवार यांनी प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'फुले' सिनेमावरून होणाऱ्या वादावर भाष्य केले.ते म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजतंय. सेन्सर बोर्ड मध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर काही परिणाम होणार आहे का याची शहानिशा केली जाते. संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे, लोकं काही बोलतात. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.