PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:42 IST2025-08-19T15:41:56+5:302025-08-19T15:42:28+5:30
- शहरात पावसाचे पुनरागमन, दिवसभरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद, वाहतूक संथ, धरणांमध्ये ९२ टक्के पाणीसाठा

PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले
पुणे : गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पावसाची केवळ रिपरिप सुरू होती. मात्र, सोमवारी (दि. १८) शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील वाहतूक संथ झाल्याचे चित्र होते.
सलग सुट्यांमुळे पर्यटनाचा प्लॅन केला होता. सुटीवरून परतणाऱ्या पुणेकरांच्या वाहनांमुळे सातारा, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरात सायंकाळी साडेपर्यंत ३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही (दि. १९) आकाश ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. धरण परिसरातही होत असलेल्या पावसामुळे चारही धरणांत दिवसभरात सुमारे पावणेदोन टक्के पाणीसाठा वाढून एकूण साठा २६.८० टीएमसी अर्थात ९२ टक्के झाला.
शहरात यंदा जुलैमध्ये गेल्या चार वर्षांतील नीचांकी पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. तर सोमवारी सकाळपासून मध्यम पावसाला सुरुवात झाली. तीन दिवसांच्या सलग सुटीनंतर कार्यालयांमध्ये हजेरी लावणाऱ्या नोकरदारांना यामुळे रेनकोट घालूनच मार्गक्रमण करावे लागले. या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळी अकरानंतर वाढला जोर
पावसाचा जोर सकाळी अकरानंतर वाढला. त्यामुळे त्यामुळे सखल भागांत रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते. काही प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. शिवाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडण्यास पसंती दिली. त्यामुळे टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रोड, तसेच मध्यवर्ती भागातील अप्पा बळवंत चाैक, नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना निश्चित स्थळी जाण्यासाठी बराच वेळ लागत होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
शहरात परतणाऱ्यांमुळे कोंडी
स्वातंत्र्यदिनामुळे सलग दिवस सुट्यांची मेजवानी मिळाली होती. याचा अनेकांनी लाभ घेतला. त्यातील काही जण सोमवारी शहरात परतले. त्यामुळे सातारा, सोलापूर, अहिल्यानगर व नाशिक महामार्गाकडून शहरात येणाऱ्या वाहनांची सकाळी गर्दी झाली होती. त्यामुळे हडपसर, सातारा रस्ता, नाशिक फाटा, तसेच कात्रज परिसरात कोंडी झाली होती.
शाळांमुळे कोंडीत भर
सोमवारी शहरातील सर्व शाळा सुरू झाल्या. त्यामुळे रस्त्यावर शालेय वाहनांची भर पडली. त्यामुळे काही भागात दुपारी आणि काही भागात सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना गर्दीतून मार्ग काढत प्रवास करावा लागला. तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळेही कोंडीत भर पडली.
वाहनचालकांना शिस्त लागणार कधी?
पाऊस असो की, नसो शहरात कायमच वाहतूक कोंडी होते. याला वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण आहे. रस्त्यामध्ये थोडी जरी वाहने अडकली तर दुचाकीचालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने घुसवतात. त्यामुळे मागून येणाऱ्यांना, तसेच पुढे जाणाऱ्यांची अडचण होते. काही बेशिस्त चालकांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो.
आजही पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहर व परिसरात मंगळवारीही आकाश समान्यत: ढगाळ राहून दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात खूप जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
खडकवासला प्रकल्पात ९२ टक्के पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे चारही धरणांत मिळून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६.१४ टीएमसी अर्थात ८९.६७ टक्के पाणीसाठा होता. रात्रभर झालेल्या आवकेमुळे सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हा साठा २६.३२ टीएमसी झाला. त्यानंतर सोमवारी पावसाने जोर पकडल्याने पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. खडकवासला धरण परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १६, पानशेत परिसरात ५९, वरसगावमध्ये ५४, तर टेमघर धरण परिसरात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी दिवसभरातील या ११ तासांमध्ये खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा तब्बल पावणेदोन टक्क्यांनी वाढला. हा साठा सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६.८० टीएमसी अर्थात ९१.९४ टक्के इतका झाला आहे. सध्या चारही धरणांमध्ये ४८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग
जिल्हाभरातही पाऊस सुरू असून चासकमान धरण १०० टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सांडव्याद्वारे १ हजार १०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तसेच अतिवाहिनीद्वारे ४०० क्युसेक असा एकूण १ हजार ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू होता. भाटघर धरणही १०० टक्के भरले असून धरणाच्या विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६३१ क्युसेक व धरणाच्या अस्वंयचलित द्वारांद्वारे ७ हजार क्युसेक असा एकूण ८ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला होता. वीर धरणातूनही नीरा नदीत ६ हजार २३८ क्युसेक इतका करण्यात येत होता.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १७९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ ४४.९ मिलिमीटरच पाऊस पडला आहे.
गेल्या पाच वर्षांतील ऑगस्टमध्ये पुणे शहरात नोंदवला गेलेला पाऊस (मिमी)
२०२४ – २७९.३
२०२३ – ४२.१
२०२२ – १६४.२
२०२१ – ४०.६
२०२० – २५५.७
शहरात रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये)
शिवाजीनगर २९.७
पाषाण २८.९
हडपसर १८
मगरपट्टा १७.५
लोहगाव १९
चिंचवड २९
लवळे ३७
जिल्ह्यातील पाऊस
गिरीवन ३२.५
तळेगाव १९
दौंड ५.५
बारामती ४.६
निमगिरी ४
डुडुळगाव ३.५
तळेगाव ढमढेरे ३
राजगुरूनगर २.५