पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:45 IST2025-05-31T16:45:07+5:302025-05-31T16:45:45+5:30
नीलेश हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता, यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते

पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला?
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी फरार नीलेश चव्हाण याला शुक्रवारी पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना दहा दिवसांनी यश आले. नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणे, चुलत्यांसह इतरांना धमकावणे याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता. नीलेश हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथले इंटरनेट वापरत असे. तो एकटाच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आठ पथके मागावर होती
चव्हाणच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकांची स्थापना केली होती. अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रँच संयुक्तपणे कारवाई करीत होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला. यामध्ये पुणे, मुंबई, कोकण, तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू केली होती. त्यानंतर दहा दिवसांनी अटक केली आहे.
पुणे ते नेपाळ नीलेश पोलिसांना कसा सापडला
आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्वच आरोपींना अटक केली असून, सध्या ते पोलिस व न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील एक आरोपी चव्हाण हाही पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला, रायगडनंतर नीलेश दिनांक २१ मे रोजी महाराष्ट्राबाहेर पडला. दिनांक २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करत होता, त्या वातानुकूलित बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात नीलेश दिसून आला. स्लीपर सीटवरून उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला नीलेश चव्हाण बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळाला. त्याने त्यानंतर सोनोली (उत्तर प्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवामार्गे सोनोलीमध्ये आल्यावर नीलेशला अटक केली. पाच दिवस तो नेपाळमध्येच मुक्कामी होता, असे पोलिसांचे मत आहे.
नीलेश चव्हाण अखेर नेपाळ सीमेवर सापडला
गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबर सेलचे पोलिस अधिकारी, कर्मचारी नीलेशचा शोध घेत होते. नीलेश हा नेपाळ, भारत सीमेवरून सहा ते सात किलोमीटर जवळ असल्याची माहिती मिळाली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने पोलिस तिथपर्यंत पोहोचले. नीलेश हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथले इंटरनेट वापरत असे. तो एकटाच राहत होता.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
नीलेश गुन्हा दाखल केल्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून तो दिल्लीला गेला. त्यानंतर दिल्ली, गोरखपूर, मार्गे सौनौली, भैरावाह मार्गे नेपाळ सीमेवरील काठमांडू असा प्रवास करीत तो गेला. त्यानंतर तो भैरावाह येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौली येथे आला. त्याची माहिती मागावर असलेल्या पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. नीलेशकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
लूक आउट नोटीस जारी
वाकड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे दोन दिवस होते. हे बाळ घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. यानंतर चव्हाण याच्यावर दिनांक २१ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. अटक होण्याआधीच फरार झाला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या. देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लूक आउट नोटीस जारी केली. त्यानंतर पोलिसांनी चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी गुरुवारी नोटीस जारी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे.
बाळाचा कायदेशीर ताबा आजीकडे
वैष्णवीच्या मृत्यूपश्चात ९ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बालकल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बालसंरक्षण समितीने जनकचा कायदेशीर ताबा आणि बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी आजी स्वाती कस्पटे यांची असेल, असे समितीने म्हटले आहे.