आरएमसी प्रकल्पांकडे का होतेय प्रशासन, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:26 IST2026-04-12T13:25:37+5:302026-04-12T13:26:21+5:30
- अधिकारी म्हणतात, प्रकल्प बंद, प्रत्यक्षात सर्व सुरूच; राडारोडा अन् केमिकलयुक्त पाणी मुठा नदीत

आरएमसी प्रकल्पांकडे का होतेय प्रशासन, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ?
- हिरा सरवदे
पुणे : रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी)प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढत आहे, गंभीर बाब म्हणजे या प्रकल्पातील राडारोडा आणि केमिकलयुक्त पाणी थेट नदीत बिनदिक्कत सोडले जात आहे, याबाबत वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होत असतानाही महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि आमदार यावर काही बोलायला तयार नाहीत? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे अधिकारी संबंधित प्रकल्प बंद केल्याचे सांगतात. मात्र, पाहणी केल्यानंतर सर्व प्रकल्प सुरळीत सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
वडगाव खुर्द (जुने गावठाण) येथील वडजाईमाता मंदिराच्या परिसरात अनेक आरएमसी प्रकल्प आहेत. यातील काही प्रकल्प हे नदीपात्राच्या लगत थाटण्यात आले आहेत, तर काही प्रकल्प नदीपासून काही अंतरावर, उड्डाण पुलाजवळ, शेतात आहेत. या प्रकल्पामुळे परिसरात धुळीचे आणि फुफाट्याचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे नागरिकांच्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवाय या प्रकल्पामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
नदीच्या किनारी थाटलेल्या प्रकल्पातील सिमेंट काँक्रीटचा राडारोडा, केमिकल मिश्रित स्लरी थेट मुठा नदीत सोडण्यात येते. यामुळे नदीतील पाणी पांढरे व लालसर झाले आहे. तसेच गाडीत शिल्लक राहिलेली सिमेंट मिश्रित खडी जागा मिळेल तिथे खाली केली जाते. येथील प्रकल्पांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई केली जाते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तहसीलदारांकडून केवळ नोटिसा पाठविण्याचा सोपस्कार पार पाडला जात आहे. मात्र, प्रकल्पांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रशासन कारवाई करत नाही. दिखाव्यापुरतीच कारवाई केली जाते. कारवाईनंतर काही तासांतच हे प्रकल्प पुन्हा सुरू होतात. आरएमसी प्रकल्पाचे डंपर आणि मिक्सरचे चालक नेहमी फोनवर बोलत बेदरकारपणे गाड्या पळवितात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याचा केवळ सोपस्कार
-रएमसी प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या या समस्यांवर 'लोकमत'ने वृत्ताच्या माध्यमातून पंधरा दिवसांपूर्वी प्रकाश टाकला होता. तेव्हापासून महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी केवळ अधिकाऱ्यांना पाठवतो, पाहणी आहवाल आल्यानंतर कारवाई करू, असेच उत्तर देत आहेत.
- दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी संबंधित प्रकल्प सील केल्याचे सांगितले. पाहणी केल्यावर हा प्रकल्प एक दिवसही बंद झाला नसल्याचे सांगितले. 'लोकमत' प्रतिनिधीने शनिवारी संबंधित प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
प्रकल्पाच्या फुफाट्याने कुणाचे उखळ पांढरे ?
नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या आणि प्रदूषणाच्या पातळीत वाढ करणाऱ्या आरएमसी प्रकल्पांकडे महापालिका, प्रदूषण मंडळ, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करीत आहेत? ते गप्प का आहेत? या फुफाट्याने कुणाचे उखळ पांढरे होते? असे सवाल उपस्थित होत आहेत.
प्रकल्प बंद करण्याची मनसेची पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी
बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राज्यकर्ते व प्रशासनाच्या वरदहस्ताने १ पुण्यात मोठ्या प्रकरणात अवैध आरएमसी प्रकल्प सुरू आहेत. पुण्यामध्ये या माध्यमातून नवीन माफिया जन्माला आले आहेत.
२ या प्रकल्पांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी व हतबल दिसत आहे. फिल्डवर फिरणारे चिरीमिरी घेऊन अनधिकृत प्रकल्पांना अभय देतात.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारवाईसाठी फक्त कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकतात. मंडळाने जे प्रकल्प बंद करण्याचा आदेश दिला आहे, ते प्रकल्प अविरतपणे चालू आहेत.
याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि हे प्रकल्प कायमचे बंद करावेत, अशी मागणी करणारे निवेदन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे.
आरएमसी प्रकल्प तातडीने हलवा : खा. प्रा. कुलकर्णी
अनधिकृत आरएमसी प्रकल्पामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना प्रकल्प चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. प्रकल्पांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे हे प्रकल्प तातडीने येथून हलवावेत, अशी मागणी खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सर्वत्र धूळ आणि रस्त्यावर एक दीड फूट फुफाटा साठलेला आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना रस्त्यावरील खड्डे कळून येत नाहीत, त्यामुळे अपघात होऊन हातापायाला इजा होते. या धुळीमुळे फुप्फुसाचे आजार होऊ लागले आहेत. हा प्रकल्प बंद करण्याची प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, एका आमदाराच्या नातेवाइकाचा एक प्रकल्प असल्याने कोणत्याच प्रकल्पावर कारवाई होत नाही. आम्ही अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महापालिका, ट्रॅफिकबाबत पोलिस अधिकारी, या प्रभागाचे नगरसेवक, आमदारांकडे तक्रार करीत आहेत. मात्र, कुणीही दाद देत नाही. - स्थानिक नागरिक