'कोंडीची शाळा' सुटणार कधी ? जीवाचा घोर संपणार कधी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:15 IST2026-03-26T14:15:01+5:302026-03-26T14:15:27+5:30
- दापोडी-सांगवी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील चित्र : वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे विद्यार्थी सुखरूप घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला

'कोंडीची शाळा' सुटणार कधी ? जीवाचा घोर संपणार कधी ?
- अमृता दातीर-जोशी
सांगवी: दापोडी, सांगवी आणि फुगेवाडी परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सांगवीतील नृसिंह हायस्कूल, शकुंतला शितोळे शाळा, दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळा, सी. के. गोयल विद्यालय, फुगेवाडीतील केंद्रीय विद्यालय, तसेच कासारवाडी येथील पिंपरी-चिंचवड माध्यमिक विद्यालय परिसरात ही समस्या तीव्र आहे.
अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने एकाच वेळी सायकलस्वार विद्यार्थी, पादचारी, रिक्षा आणि दुचाकींची मोठी गर्दी होते. शाळा सुटताच शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येतात. त्याचवेळी पालकांची उपस्थिती, खासगी वाहने आणि स्कूल बसची वर्दळ वाढते. या गर्दीत काही वाहनचालक नियमांचे पालन न करता वाहने रेटत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडते. वाहतूक पोलिस किंवा बीट निरीक्षक अनेकदा अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते.
त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहतो. याशिवाय रस्त्याच्या कडेला उभी केलेली बेवारस व अव्यवस्थित वाहने आणि अतिक्रमणामुळे कॉडीत अधिक भर पडते.दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील मेट्रो कामे तसेच मुख्य रस्त्यांवरील वाढत्या वर्दळीमुळे शाळा सुटल्यानंतर अर्धा तास वाहतूक कोंडी कायम राहते. तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
संवेदनशील चौकांमध्ये वाहतूक पोलिस द्या
नवीन शैक्षणिक वर्षापासून तरी संवेदनशील चौकांमध्ये वाहतूक पोलिस किंवा बीट मार्शलची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
शाळांच्या परिसरात अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे अवघड जाते. शाळेजवळील बेवारस वाहनांवर तातडीने कारवाई करावी. - शरद ढोरे, मुख्याध्यापक, नृसिंह हायस्कूल
शाळेच्या वेळेत वाहतूक कोंडी वाढते. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. शाळेबाहेरील बेवारस वाहनांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांची मदत उपलब्ध करावी.- शिवाजीराव माने, मुख्याध्यापक, कै. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा
विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र बेशिस्त वाहनचालक आणि नियोजनाच्या अभावामुळे अपघाताची भीती कायम आहे. शाळा सुटण्याच्या वेळी किमान बीट मार्शलची नियुक्ती करावी. - संतोष काटे, स्थानिक रहिवासी