जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी...! शेतकरी कुटुंबातील लेक झाली 'अधिकारी'; यूपीएससी परीक्षेत मिळवले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:54 IST2026-03-07T12:52:58+5:302026-03-07T12:54:14+5:30
- या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा क्रमांक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.

जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी...! शेतकरी कुटुंबातील लेक झाली 'अधिकारी'; यूपीएससी परीक्षेत मिळवले यश
पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील खेळवाडी, ता. मालेगाव येथील शेतकरी कुटुंबातील प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. ऑगस्ट २०२५ मधील यूपीएससी ‘नागरी सेवा’ अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा क्रमांक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
प्रेरणा खवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या यशामध्ये तिला आई-वडिलांची प्रेरणा मिळाली. वडील शेती करतात, तर आई गृहिणी आहेत. कुटुंबात दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. ते सर्व लहान असून भाऊ व बहिणीचे शिक्षण सुरू आहे. कुटुंबाची परिस्थिती सामान्य आहे. जिद्ध आणि चिकाटी असेल, तर यूपीएससीसारख्या मोठ्या परीक्षेत यश संपादन करता येते, असा सल्ला प्रेरणा खवळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. या यशाबद्दल ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे आणि निबंधक इंदिरा अस्वार यांच्या वतीने तिच्या यशाचा गौरव केला. तिच्या यशामुळे मातंग समाजातील प्रेरणाचे हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
‘आर्टी’चे पाठबळ
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईमार्फत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. प्रेरणालादेखील या योजनेचा लाभ मिळाला, ज्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली आणि यश संपादन करता आले.
यूपीएससी परीक्षेसाठी पुण्यात ऑनलाइन क्लासने तयारी केली. नंतर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास राष्ट्रसेवा दल येथील अभ्यासिकेत केला. स्पर्धा परीक्षेसाठी सुरुवातीला बार्टी व मुलाखतीसाठी आर्टीचे मोठे सहकार्य मिळाले आहे. मी बीएस्सी ॲग्री शिक्षण घेतले असून, घरची परिस्थिती सामान्य आहे. या यशामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत आर्थिक साहाय्य मिळाले. त्यामुळे यश मिळवू शकले. - - प्रेरणा खवळे, विद्यार्थिनी