यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका;पन्नासहून अधिक विद्यार्थी पात्र; डॉ.अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:59 IST2026-03-07T12:59:35+5:302026-03-07T12:59:57+5:30
देशात अव्वल स्थान डॉ.अनुज अग्निहोत्री यांनी पटकावला असून, राजेश्वरी सुवे एम द्वितीय, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका;पन्नासहून अधिक विद्यार्थी पात्र; डॉ.अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ६) जाहीर झाला. यात ९५८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यातील ५० हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील असल्याचे दिसून येत आहे. देशात अव्वल स्थान डॉ.अनुज अग्निहोत्री यांनी पटकावला असून, राजेश्वरी सुवे एम द्वितीय, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
यूपीएससीतर्फे ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर, नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली.
जाहीर केलेल्या निकालामध्ये ३४८ उमेदवारांची शिफारस तात्पुरत्या स्वरूपातील आहे, तर २ उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. संबंधित प्राधिकरणांकडून सर्व आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
---------
सेवा पदसंख्या
भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) - १८०
भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) - ५५
भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) - १५०
केंद्रीय सेवा गट अ ५०७, केंद्रीय सेवा गट ब १९५