आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांसह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:53 IST2026-04-03T11:52:05+5:302026-04-03T11:53:06+5:30
- शेतमालासह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांसह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान
मंचर : आंबेगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शेतमालासह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुपारी तीनच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कळंब, अवसरी, लौकी, चांडोली, श्रीक्षेत्र वडगाव-काशिंबेग आदी गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अवकाळी पावसामुळे द्राक्षे, आंबा, चिकू यांसारख्या फळपिकांसह कांदा, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी आदी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतात काढून ठेवलेला कांदा, बटाटा व कडबा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
वीटभट्ट्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून, तयार मालाचे नुकसान झाले आहे. वीटभट्टी झाकण्यासाठी मालक व कामगारांची धांदल उडाल्याची माहिती कळंब येथील वीटभट्टी मालकांनी दिली. चांडोली येथील वीटभट्टी मालक शंकर थोरात यांनी अचानक आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.
दरम्यान, मंचर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. एसटी बसस्थानकात पाणी साचले, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक फलक उडून पडले व फ्लेक्स फाटले. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. याआधीही लोणी, धामणी, वाळुंजवाडी येथे गारपिटीमुळे नुकसान झाले होते. पुढील दोन दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.