दिवे घाटात अनियोजित ब्लास्टिंगमुळे वाहतूक ठप्प; वाहनचालकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:10 IST2026-01-27T19:04:48+5:302026-01-27T19:10:36+5:30
- घाटापर्यंत दोन्ही बाजूंनी पोहचलेली वाहने कोंडीला कंटाळून पुन्हा मागे वळवली जात होती, अनेकांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

दिवे घाटात अनियोजित ब्लास्टिंगमुळे वाहतूक ठप्प; वाहनचालकांमध्ये संताप
फुरसुंगी : दिवे घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. हे काम नियमितपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केले जात आहे. मंगळवारी, २७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संताप पसरला होता. सायंकाळपर्यंत दिवे घाटामध्ये वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
घाटापर्यंत दोन्ही बाजूंनी पोहचलेली वाहने कोंडीला कंटाळून पुन्हा मागे वळवली जात होती, अनेकांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्याचादेखील वाहतूक विस्कळीत होण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसला. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर पुण्यात परतणाऱ्या वाहनचालकांची मंगळवारी दिवे घाटात मोठी गर्दी होती. नेमक्या याच वेळी करण्यात आलेल्या ब्लास्टिंग दरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणातील दगड उडून रस्त्यावर कोसळले. हे दगड हटवण्यासाठी मोठा वेळ लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
दिवे घाटात अनियोजित ब्लास्टिंगमुळे वाहतूक ठप्प; वाहनचालकांमध्ये संताप #pune#traffic#punetraffic#diveghat#Maharashtrapic.twitter.com/M73cBY1PpQ
— Lokmat (@lokmat) January 27, 2026
सुमारे दोन तास वाहतूक बंद राहिल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक-एक लेन सुरू करून हळूहळू वाहतूक सुरळीत केली. मात्र तोपर्यंत वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जी वाहने घाटात आली ती अडकून पडली. मात्र घाटात प्रवेश होण्यापूर्वीच सावध झालेल्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. अचानक आणि गर्दीच्या वेळेत ब्लास्टिंग केल्यामुळे रस्ता विस्तारीकरणाच्या कामाच्या नियोजनाचा अभाव आढळला. प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. भविष्यात अशा कामांचे योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.