आता पुण्यातही झळकणार तीन अक्षरी वाहन नंबर; प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:27 IST2026-03-21T09:27:34+5:302026-03-21T09:27:56+5:30
राजधानी दिल्लीनंतर तीन अक्षरी सिरीज सुरू करणारे पुणे हे दुसरे शहर ठरणार आहे.

आता पुण्यातही झळकणार तीन अक्षरी वाहन नंबर; प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोठा बदल
पुणे : झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे आता वाहन क्रमांकांच्या सिरीजमध्ये मोठा बदल होणार आहे. दोन इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तीन इंग्रजी अक्षरांची नवी सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नवे नंबर रस्त्यावर झळकताना दिसणार आहेत. राजधानी दिल्लीनंतर तीन अक्षरी सिरीज सुरू करणारे पुणे हे दुसरे शहर ठरणार आहे.
सध्या पुणे आरटीओमध्ये (एमएच १२) दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांसाठी दोन अक्षरी मालिका सुरू आहे. यामध्ये सध्या 'झेडके' (झेडके) ही मालिका वेगाने संपुष्टात येत आहे. शिवाय, पुण्यात दुचाकी वाहन क्रमांकाची मालिका संपण्यास फक्त १५ दिवस लागतात. तर चारचाकी वाहनांसाठी मालिका संपण्यास दोन महिने लागतात. सध्या शहरात ४३ लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये जवळपास ३० लाख दुचाकी आहेत.
दरवर्षी सुमारे ३ लाख नवीन वाहनांची भर पडत असल्याने सध्याची ‘झेडके’ सिरीज वेगाने संपत चालली आहे. दुचाकींसाठी सिरीज केवळ १५ दिवसांत संपते, तर चारचाकींसाठी दोन महिने लागतात. गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया, दिवाळी पाडवा आणि लक्ष्मी पूजन यांसारख्या मुहूर्तांवर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात सिरीज आणखी वेगाने संपते. नवीन तीन अक्षरी सिरीज ‘एएए’ पासून सुरू होणार असून, भविष्यातील ३०-४० वर्षांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असे होणार फायदा :
-अधिक क्रमांक उपलब्ध होणार
-फॅन्सी नंबरसाठी जास्त पर्याय
-महसूल वाढण्याची शक्यता
-नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ
-फॅन्सी नंबरमुळे महसूल वाढणार
आरटीओच्या महसुलात वाढ होणार :
तीन अक्षरी मालिकेमुळे ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. शब्द तयार होण्याची संधी वाढल्याने शौकीन वाहनधारकांकडून आरटीओला मोठा महसूल मिळणार आहे. पुण्यातील वाढती वाहन संख्या लक्षात घेता, दोन अक्षरी सिरीज पुरेशी राहिलेली नाही. त्यामुळे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे आवश्यक झाले आहे. यामुळे पुढील अनेक वर्षे क्रमांकांची कमतरता भासणार नाही. तीन अक्षरी मालिकेमुळे नवीन क्रमांकांचे पर्याय उपलब्ध होतील. तसेच यामध्ये शब्द तयार होण्याची संधी असल्याने ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे.