देशात खरेखुरे राजकीय नेतृत्वच राहिले नाही; प्रकाश आंबेडकरांची नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:27 IST2025-08-26T16:26:31+5:302025-08-26T16:27:47+5:30
एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे?

देशात खरेखुरे राजकीय नेतृत्वच राहिले नाही; प्रकाश आंबेडकरांची नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका
पुणे: पक्षापलिकडे जाऊन देशहित पाहणारे राजकीय नेतृत्वच पुण्यात राहिले नाही. अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग या श्रेणीतील अखेरचे नेते होते अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्यक्ष नाव न घेता केली.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी पत्रकार भवनमधील कमिन्स सभागृहात ॲड. आंबेडकर यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील यांनी ॲड. आंबेडकर यांचे स्वागत केले. सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी प्रास्तविक केले. आंबेडकर यांनी सुरूवातीला आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सांगितले की, ‘एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे? याचा अर्थ त्यांच्यात एखाद्याला काढण्याची धमक राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे नेते पक्षातील नेत्यांना सांभाळण्याचे काम करतात, देश, देशाची व्यवस्था, जनहित याच्याशी त्यांचा काही संबध राहिलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांची थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे.
देशातील दलित मतदारांची संख्या ९ टक्के आहे. त्यातील ३० टक्के मतदार हा काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. देशाच्या एकूण मतदारांपैकी ३० टक्के मतदार असा आहे की तो दलित उमेदवारांना कधीही मतदान करणार नाही. त्यामुळेच त्या मतांचा प्रभाव राहिलेला नाही, मात्र येत्या २० वर्षांमध्ये या स्थितीमध्ये मोठा फरक पडेल, शिकलेल्या नव्या दलित पिढीचे विचार वेगळे आहेत, ते त्यांचा प्रभाव निश्चितपणे निर्माण करतील असेा विश्वास ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे, मात्र त्याऐवजी त्यांनी सायंकाळी ६ वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या चित्रणाचा मुद्दा लावून धरायला हवा. याचे कारण खुद्द निवडणूक आयोगानेच सायंकाळी ६ नंतरच्या मतदानाचे चित्रिकरण उपलब्ध नाही असे जाहीर केले आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर करून घ्यायच्या मतदानाचे काही नियम आहे. त्याचे पालन केले गेले की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. वाढलेले मतदार किंवा दुबार मतदार हा मुद्दा फार महत्वाचा नाही, मतदार याद अद्यायावत करण्याचे काम सुरूच असते असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेने आपल्याला जास्त टेरिफ लावल्याने देशात मोठा फरक पडणार नाही. देशाला आपल्या व्यापारासाठी आफ्रिकी देश आहेत. अन्य देश आहेत. देशातील २५ कोटी लोक असे आहेत जे १ कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती निर्माण करतात. ही एक मोठी बाजारपेठ आहे व त्याकडे अमेरिकेला दुर्लक्ष करता येणार नाही. रशिया आपला जुना मित्र आहे, पण आता तो पाकिस्तानचाही मित्र झाला आहे. ऑपरेशन सिंदुर नंतर जगातील अनेक देश आपल्याबरोबर नव्हते याकडे लक्ष द्यावे लागेल. - ॲड. प्रकाश आंबेडकर