बारामतीच्या विमानतळावर नाइट लँडिंगचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:23 IST2026-03-07T15:23:18+5:302026-03-07T15:23:39+5:30
- अर्थसंकल्पात तरतूद; उद्योगाला मिळेल चालना

बारामतीच्या विमानतळावर नाइट लँडिंगचा मार्ग मोकळा
बारामती : बारामती विमानतळावर नाइट लैंडिंगसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बारामतीसह लातूर, अमरावती आणि यवतमाळ येथील विमानतळांवर नाइट लँडिंग सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.
बारामती बारामती विमानतळावर नाइट लँडिंगची सोय करणार असल्याची घोषणा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध कार्यक्रमांतून अनेकदा केली होती. त्यानुसार बारामती एमआयडीसीतील विमानतळ रिलायन्सकडून राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने नाइट लैंडिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे पहिले पाऊल पडले आहे.
बारामती हे विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखले जात असले तरी उद्योगांना पूरक दळणवळणाच्या सुविधा वाढविण्याची गरज अधोरेखित होत होती. या पार्श्वभूमीवर बारामती जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी विमानतळावर नाइट लँडिंगची घोषणा केली होती. त्यानंतर विमानतळ शासनाकडे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता निधी उपलब्ध झाल्याने विमानतळाचा कायापालट होण्याची शक्यता आहे.
अपघाताची आठवण अजूनही आहे ताजी याच बारामती विमानतळावर विमान उतरवताना झालेल्या अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. त्या घटनेनंतर हे विमानतळ देशभर चर्चेत आले. अपघातानंतर 3 विमानतळावरील सुरक्षेबाबतच्या अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. आता नाइट लँडिंगसह आधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याने या त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे.
मात्र, बारामतीकरांपासून 3 त्यांच्या लाडक्या नेत्याला हिरावून नेणारा तो अपघात आजही नागरिकांच्या मनात कायम घर करून आहे. बारामती शहराला पालखी महामार्गासह विविध महत्त्वाचे महामार्ग जोडले गेले आहेत. त्यात विमानसेवेची सुविधा अधिक मजबूत झाल्यास बारामतीची दळणवळणाच्या नकाशावर ओळख आणखी ठळक होणार आहे. नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योजकांना 'एअर कनेक्टिव्हिटी' मिळणार असून, 'हॉपिंग' विमानसेवाही सुरू होऊन परिसरात गुंतवणूक वाढून उद्योगाला चालना मिळेल आणि रोजगारनिर्मितीही वाढेल.