मुळा-मुठेच्या पाण्याला कायमच स्वातंत्र्याची ओढ
By राजू इनामदार | Updated: August 16, 2025 13:10 IST2025-08-16T13:10:38+5:302025-08-16T13:10:59+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा : सामान्यातील सामान्य माणूसही स्वातंत्र्याचा भोक्ता

मुळा-मुठेच्या पाण्याला कायमच स्वातंत्र्याची ओढ
पुणे : पुण्याच्या पाण्यालाच बहुधा पारतंत्र्याचे वावडे असावे, कारण स्वातंत्र्याची पहिली हाक याच पुण्याने बाल शिवाजीच्या माध्यमातून दिली. दऱ्याखोऱ्यांमधून घोडी पळवत बाल शिवाजीने तोरणा किल्ल्यावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकला. त्यानंतर मग स्वातंत्र्याचा हा लढा इंग्रजांना भारतातून पळवून लावल्यावरच थांबला. पारतंत्र्याची बेडी इथे कोणालाच सहन होत नाही. त्यामुळे शालेय वयाच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत इथला प्रत्येक जण स्वातंत्र्यप्रेमी आहे. मग ते स्वातंत्र्य राजकीय असो, सामाजिक असो किंवा अन्य कुठले...!
बाल शिवाजीपासून प्रेरणा मिळाली असल्याने पुढे पुणे शहराने इंग्रजी राजवट वगळता पारतंत्र्य कधी पाहिलेच नाही. उलट मुळा-मुठेच्या पाण्यातून प्रेरणा घेऊन इथला माणूस थेट पानिपतावर परकीय आक्रमकांना भिडला. तिथे लढाई हरला, पण जिंकलेल्या अहमदशहा अब्दालीला त्यांचा इतका धसका बसला की त्याने परत कधी वळून भारताकडे पाहिले नाही. पेशवाईत शनिवारवाड्यातून दिल्लीचा कारभार बघितला जात असे इतका प्रभाव पुण्याचा निर्माण झाला.
पुढे काळ बदलला, लढाईचे तंत्र बदलले, इंग्रज आले. त्यांनी नव्या आधुनिक तंत्राने सारा भारत ताब्यात घेतला. तसेच पुणेही घेतले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. मात्र, तो ज्या दिवसापासून (जानेवारी १८१८) फडकला त्याच दिवसापासून इथला लहानमोठा माणूस स्वातंत्र्य मिळवण्याच्या तयारीला लागला. ही लढाई मग थेट १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत चालली. या लढाईतही ऐन धामधुमीच्या काळात सुरुवातीची किमान १०० वर्षे संपूर्ण देशातील स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व पुणे शहराने केले. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीने देशात जी चळवळ सुरू केली त्याची पायाभरणीही याच पुण्यात झाली होती.
सुरुवात झाली लहानमोठ्या लढायांपासून! वस्ताद लहुजी साळवे यांनी तरुणांचे संघटन उभे केले. त्याही आधी वासुदेव बळवंत फडके यांनी दऱ्याखोऱ्यातील काही युवकांच्या मदतीने स्वातंत्र्याचा वारा अनुभवला. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याच्या या लढाईच्या बरोबरीनेच महात्मा जोतिबा फुले नावाच्या एका युवकाने सामाजिक स्वातंत्र्याचा पुकारा केला. रूढी, परंपरा, प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी एकट्याने सुरू केलेल्या या लढाईत पुढे त्यांना अनेक जण येऊन मिळाले. सामाजिक सुधारणांचे वादळ देशात निर्माण करण्यातही पुण्याचे फार मोठे योगदान आहे.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी प्रशासनात राहून सनदशीर मार्गाने न्याय हक्कांच्या मागण्या सुरू केल्या. विष्णूशास्त्री चिपळणूकरांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशाविषयी तरुण पिढीत प्रीती जागवली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी राजकारणाचा वसा घेतला. गोपाळ गणेश आगरकरांनी सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. हे सगळे पुण्यात झाले. इंग्रजांनी सारा देश काबीज केला होता. आता शस्त्रांची लढाई चालणार नाही हे ओळखून या थोरांनी लढाईचे आपापले नवे पवित्रे तयार केले. त्यांना त्यांच्यासारख्याच स्वातंत्र्यप्रिय तरुणांची साथ याच पुण्यात मिळाली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन १८८५ मध्ये पुण्यातच होणार होते, मात्र ऐनवेळी साथीच्या आजाराची लाट पुण्यात आली व पुणे शहराचा हा योग हुकला.
इंग्रजांची मांड पक्की झाली होती तरीही अस्त्र शस्त्रांविषयीचे इथल्या लोकांचे प्रेम कमी झाले नव्हते. रँड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांचा खून इथल्याच चाफेकर बंधूंनी गणेश खिंडीमध्ये केला. त्यापासून देशातील अनेकांना प्रेरणा मिळाली. नाशिकच्या भगूरमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या महाविद्यालयीन तरुणाने पुण्यात आपली चळवळ सुरू केली. त्याचेही तरुणपणातील भरणपोषण याच पुण्यातील मुळा-मुठेच्या पाण्याने झाले होते. त्याच्या असीम त्यागाने ही क्रांतिकारी चळवळ अल्पावधीतच देशव्यापी झाली. इंग्रज अधिकाऱ्यांचे खून होऊ लागले. क्रांतिकारकांची एक मोठी फळीच देशात तयार झाली व त्यांनी इंग्रज राजवटीला धडकी भरवली.
त्याचवेळी सनदशीर मार्गाने लढणाऱ्यांची एक मोठी चळवळच काँग्रेसच्या माध्यमातून देशात सुरू झाली. पुण्याचा वाटा त्यातही मोठा होता. पुण्यातलेच लोकमान्य टिळक या चळवळीचे लोकमान्य नेते होते. संपूर्ण देशात त्यांचे वजन होते. त्यांनीच या चळवळीला सनदशीर मार्गाबरोबरच होमरूलच्या माध्यमातून नवी दिशा दिला. इंग्रजांच्या राजवटीने शेतकऱ्यांची, स्थानिक व्यापार उदिमाची, ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायांची झालेली परवड लोकमान्यांनीच सर्वप्रथम देशाच्या पटलावर आणली. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांना ताकद दिली. ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी’ ही टीका लोकमान्यांनी पदवीसारखीच मिरवली. रत्नागिरीचा जन्म असलेल्या टिळकांची कर्मभूमी हेच पुणे शहर झाले.
लोकमान्य टिळक यांचे देहावसान झाले (१ ऑगस्ट १९२०), त्यानंतर महात्मा गांधी यांचा उदय झाला. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू पुण्यातून गुजरातला हलला, मात्र तरीही पुणे शहराचे महत्त्व कमी झालेले नव्हते. काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे हे या चळवळीचे पुण्यातील खंदे समर्थक. त्यांनी ही चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात नेली. शेतकरी वर्गाचा भक्कम आधार त्यांनी काँग्रेसच्या मागे उभा केला. ती इतकी वाढली की सन १९४२ च्या चळवळीत आंदोलनासाठी म्हणून तळेगावातून पुण्यात आलेल्या नारायण दाभाडे या युवकाचा काँग्रेस भवनजवळ गोळी लागून मृत्यू झाला.
सारा देश पेटला होता. पुण्यातून मोठी कुमक तयार झाली होती. गल्लीबोळात चर्चा चालत त्या स्वातंत्र्याच्या, चळवळीच्या. इथला सामान्यातला सामान्य माणूसही महात्मा गांधी यांच्या एका शब्दासाठी प्राण द्यायला तयार झाला होता. छोडो भारत चळवळीचा तडाखाच इतका मोठा होता की आता इथे आपल्याला राज्य करणे शक्य होणार नाही हे इंग्रजांना आपसूक समजले. त्यांनी मग भारत सोडला तो सोडलाच. १५ ऑगस्ट १९४७ ची पहाट उगवली ती स्वातंत्र्याचे गाणे गातच. इथल्या अनेकांच्या त्यागाचे, बलिदानाचे, घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याच्या त्यांच्या धाडसाचे स्मरण करत पुणेही त्यात आनंदाने सहभागी झाले.