अचानक संपर्क तुटला..! उत्तराखंडमध्ये अडकले पुण्यातील २२ पर्यटक;नातेवाईक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:17 IST2025-08-06T17:17:21+5:302025-08-06T17:17:43+5:30
१९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र असून, १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी निघाले होते. त्यांनी बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.

अचानक संपर्क तुटला..! उत्तराखंडमध्ये अडकले पुण्यातील २२ पर्यटक;नातेवाईक चिंतेत
आंबेगाव (पुणे जि.) - उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ पर्यटक अडकले असून, गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
अधिकच्या माहितीनुसार, ही मंडळी श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र असून, १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी निघाले होते. त्यांनी बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.
ढगफुटीमुळे परिसरात वीजपुरवठा ठप्प झाला असून, दूरसंचार यंत्रणा देखील कोलमडल्याने संपर्क साधणं अशक्य झालं आहे. यामुळे अडकलेल्या पर्यटकांबाबत काही काळ निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, सर्व २२ पर्यटक सुरक्षित आहेत. तर राज्याचे माजी सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी थेट संपर्क साधत मदतीची विनंती केली आहे. त्यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी सतत संपर्क ठेवत पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्री परिसरातील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत. मात्र ढगफुटीमुळे वीज व संपर्क सुविधा खंडित झाल्यामुळे काही काळ संभाषण होणं शक्य नसलं, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. संबंधित पर्यटकांचे नावे अद्याप जाहीर करण्यात आली आहे, तर नातेवाइक व गावकरी प्रशासनाकडून सातत्याने संपर्क साधत आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लवकरच हे पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परत येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या पर्यटकांची नावे पुढील प्रमाणे :
अशोक भोर, सविता काळे ,अशोक टेमकर, लीला रोकडे ,माणिक ढोरे, मारुती शिंदे, समृद्धी जंगम, सतीश मेंगडे, लीना जंगम, पुरुषोत्तम, संगीता वाळुंज, गहिनीनाथ शिंदे, अरुण सातकर, विठ्ठल खेडकर, सुनिता ढोले ,नितीन जाधव, मंगल अशी या पर्यटकांची नावे आहेत.