दूषित पाण्यामुळे पुणेकर त्रस्त; नागरिकांना जीबीएस आजाराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 21:26 IST2026-02-25T21:26:38+5:302026-02-25T21:26:38+5:30
- हेल्थतज्ज्ञांनी दिला इशारा; पीएमसी बदलणार १५ दिवसांत ११५ ठिकाणच्या जलवाहिन्या

दूषित पाण्यामुळे पुणेकर त्रस्त; नागरिकांना जीबीएस आजाराचा धोका
पुणे : पुण्यातील गणेशखिंड, आकाशवाणी अधिकारी-कर्मचारी वसाहत, कोंढवा, हडपसर, कात्रज, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, संतोषनगर आणि अंजीननगर यांसह पीएमसीच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ११५ भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात तशा नोंदीही आहेत. शिवाजीनगर, पर्वती दर्शन, सनसिटी, माणिकबाग, धनकवडी, धायरी, किरकटवाडी आणि रहाटणी, पवननगर येथील रहिवासी दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असून दूषित पाणी प्यायल्याने ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’(जीबीएस)सारख्या गंभीर आजारांचा धोका बळावत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
दरम्यान, जुन्या जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनचे अंतर जवळ असल्याने सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. यासाठी संपूर्ण शहरातील विविध भागांत तब्बल ११५ ठिकाणी नवीन जलवाहिन्या बदलण्यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय, तांत्रिक मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रियांना वेग देण्यात येणार असून, येत्या १५ दिवसांत शहरातील ११५ भागांत जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती पीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर यांनी दिली.
पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या लोकसंख्येला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यातच विविध केबल कंपन्यांचे भूमिगत केबल व मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी रस्तेखोदाई केली जाते. अशा वेळी ५० ते ६० वर्षे जुनाट जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांचे जाळे, जलवाहिन्यांच्या शेजारीच भूमिगत टाकलेल्या ड्रेनेज लाइनची गळती होऊन सांडपाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळते. शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरमधून थेट पिण्याच्या पाइपलाइन टाकल्याने जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमध्ये चेंबरचे पाणी मिसळत आहे. याशिवाय शहरातील विविध भागांतील नागरिकांनीही नळ कनेक्शन घेताना ड्रेनेज लाइन व ड्रेनेज चेंबरमधून अर्धा इंचीपासून १ ते ३ इंचांचे निवासी व व्यावसायिक कनेक्शन जोडल्याने पिण्याच्या पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळते. आता पीएमसीने २० कोटी रुपये खर्च करून जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे. तरीही नागरिकांनीही जुनाट नळ कनेक्शनचे पाइप बदलणे आवश्यक असल्याचे स्थापत्यतज्ज्ञ अरविंद गिरगावकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
१५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तब्बल ११५ ठिकाणी गत महिन्याभरापासून दूषित पाण्याच्या तक्रारी नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. नळावाटे ड्रेनेजमिश्रित काळे व फेसाळयुक्त, तर अनेक भागांत केमिकलयुक्त वास असणारे पाणी नळावाटे येत असल्याच्या गंभीर तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात पीएमसीच्या मुख्य आरोग्याधिकारी डाॅ. नीना बोराडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा दूषित पाण्यामुळे ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ यासारख्या गंभीर आजाराचा धोका असल्याची अभ्यासपूर्ण माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.
‘जीबीएस’ रुग्णांच्या नोंदी घेण्यात आरोग्य विभाग कमी
पुण्यात खडकवासला व इतर भागांत काही महिन्यांपूर्वी ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’चे रुग्ण आढळून आले होते; पण केवळ दूषित पाणी हेच त्याला एकमेव कारण नसून १७ ते १८ विविध कारणे असल्याचे पीएमसीच्या आरोग्य विभागाच्या साथरोग निवारण केंद्राच्या डाॅ. वैशाली जाधव यांनी म्हटले आहे. सद्य:स्थितीत आमच्याकडे कुठल्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयाकडून जीबीएस आजाराच्या रुग्णांची नोंद केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी येतात तिकडे आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून तातडीने उपचार व उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र संपूर्ण शहरात दूषित पाणी दिले जात असताना ‘जीबीएस’च्या रुग्णांच्या नोंदी घेण्यात आरोग्य विभाग कमी पडत असल्याची स्थिती आहे.
टँकरने मोफत पाणीपुरवठा
दुसरीकडे, ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत असेल, अशा भागांत तातडीने पाणीपुरवठा खंडित करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असल्याचा दावा पीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे.
दूषित पाणी टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून पिणे हाच एकमेव उपाय असल्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी पुणेकरांना दिला आहे. पुण्यात दूषित पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम या गंभीर आजाराची लागण काही महिन्यांपूर्वी नांदेड सिटी, किरकटवाडी, धायरी, खडकवासला, धनकवडी, कोंढवा, शिवाजीनगर व इतर भागांत झाल्याचा दावा आरोग्यतज्ज्ञांनी केला आहे. याशिवाय डोकेदुखी, उलट्या, अतिसार, त्वचेचे रोग, विषमज्वर, कॉलरा, कावीळ आणि पोटाचे व इतर विकारांचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. गुलियन बॅरी सिंड्रोम या गंभीर आजारामुळे स्नायूंमध्ये कमजोरी आणि अर्धांगवायू होण्याची दाट शक्यता असल्याचे थोरात यांचे मत आहे.
पुणेकरांनो, ही घ्या काळजी
- पाणी नेहमी उकळून प्यावे.
- पाण्याची साठवणूक स्वच्छ भांड्यात करावी.
- पिण्याचे पाणी क्लोरिनेटेड असावे.
- आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- घराचे जुनाट नळ कनेक्शन बदलून घ्यावे.