पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा;‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:05 IST2026-04-05T11:04:39+5:302026-04-05T11:05:19+5:30
- महिनाभरापूर्वीच दिला होता शहरात ४४ हजार ५०० धोकादायक झाडे असल्याचा इशारा - प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आणखी एका महिलेला गमवावा लागला जीव

पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा;‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते
पुणे : शहरातील ५८ लाख ५६१ झाडांपैकी तब्बल ४४ हजार ५०० झाडे धोकादायक असून, पाच वर्षांत झाडपडीमुळे किती नागरिकांचा मृत्यू झाला. यांसह नशीब बलवत्तर असल्याने फर्ग्युसन रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणींचे प्राण वाचले, यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ५ मार्च रोजी दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्यांचा योग्य बंदोबस्त केला असता तर सिंहगड रस्त्यावरील फुलविक्रेत्या रंजना नवनाथ गिरी यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे आतातरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका हद्दीत ५८ लाख ५६१ झाडे आहेत. शहराची नैसर्गिक रचना बशीसारखी असल्याने आणि शहराच्या आसपास डोंगरी भाग असल्याने शहराच्या लोकसंख्येएवढी झाडांची संख्या आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि खोदाईच्या कामांमुळे एकूण झाडांच्या संख्येपैकी ४४ हजार ५०० झाडे धोकादायक आहेत. यामुळे पावसाळा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आाणि फांद्या कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकदा अपघात घडून नागरिकांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. मागील ५ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरातील धोकादायक झाडांमुळे ६८ नागरिकांचे बळी गेले असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
मागील महिन्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच ते सहा महाविद्यालयीन मुली झाडाच्या सावलीखाली गप्प मारत फुटपाथवर थांबल्या होत्या, त्यावेळी येथील झाडाची फांदी त्यांच्या जवळ कोसळली. या अपघातामध्ये महाविद्यालयीन तरुणी नशीब बलवत्तर होते म्हणून वाचल्या. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने ५ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये शहरातील धोकादायक झाडांचा लेखाजोखा मांडण्यासह महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडे व धोकादायक फांद्या तोडून टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने या वृत्ताची दखल घेतली नाही, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आणखी एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.
वादळी पावसात कोसळली दोनशे ते अडीचशे झाडे
शहर व परिसरात सोमवार, बुधवार आणि गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दोनशे ते अडीचशे झाडे कोसळली. यामध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या पावसात सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती तेथे झाड कोसळून फुलविक्रेत्या रंजना गिरी यांचा मृत्यू झाला. महापालिकेने रंजना गिरी यांच्या कुटुंबाला पाच लाखाची नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, वेळीच महापालिकेने शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्यांचा बंदोबस्त केला असता, तर रंजना गिरी यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, हा प्रश्न कायम आहे.