तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:20 IST2025-06-02T15:15:36+5:302025-06-02T15:20:16+5:30
‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर
पुणे : पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, प्रवाशांना झळ बसणार आहे. त्यामुळे भाडेवाढ रद्द करावी. गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी काढला, पण सत्ताधारी भाजपने पीएमपी सक्षम करण्यासाठी दरवाढ योग्य असल्याचे स्पष्ट केले, शिवाय संस्था टिकविण्यासाठी आवश्यक आहे, असा सूर काढला.
सजग नागरिक मंच आणि पीएमपी प्रवासी मंच यांच्या वतीने ‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची मते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, रिपब्लिकन पार्टीचे डॉ.सिद्धार्थ धेंडे, काँग्रेसचे संजय बालगुडे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सचिव संजय शितोळे आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णयच बेकायदा आहे. एखादा धोरणात्मक निर्णय घेताना लोकांचा प्रतिनिधी संचालक मंडाळामध्ये असणे आवश्यक असते, पण आरटीएमध्येही लोकांचा प्रतिनिधी नव्हता, तसेच पीएमटी आणि पीसीएमटीचे एकत्रिकरणाचा निर्णय शहरासाठी मारक ठरत आहे.
डॉ.धेंडे म्हणाले, पीएमपीच्या दरवाढीला आमच्या पक्षाचा विरोध आहे, कारण या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. दरवाढ करताना संचालन तूट का वाढते, हे पीएमपीने जाहीर केलेले नाही. प्रशासकीय चुकीमुळे तूट वाढत आहे.
बालगुडे म्हणाले, पीएमपीने अकरा वर्षांनंतर दरवाढ केली असली, तरी ही दरवाढ खूप आहे. ती कमी करावी. या दरवाढीचा दुसऱ्या आणि शेवटच्या स्टेजमध्ये प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार आहे. तिकीट दरवाढ न होण्यासाठी पीएमपीच्या जागा विकसित करून, जाहिरातीमधून उत्पन्न वाढवावे.
काही गोष्ट बदल करण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो. २०१४ नंतर ही दरवाढ केली आहे. या काळात सीएनजी दर वाढले. एसटी महामंडळ, मुंबईत बेस्टने दरवाढ केली. एखादी संस्था जगण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. पीएमपीला सदृढ करण्यासाठीच ही दरवाढ केली असून, ती योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून पीएमपीची तूट वाढत आहे. ही तूट दोन्ही महापालिका देतात. त्यामुळे दरवाढ करू नकाच, हे योग्य नाही. पीएमपी सक्षम करण्यासाठी तिथे चालणाऱ्या गैरप्रकाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे संदीप खर्डेकर म्हणाले.