Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:16 IST2025-09-26T09:15:17+5:302025-09-26T09:16:49+5:30
- वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करणार

Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार
पुणे : एकतानगर, विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व वस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटींचा निधी राज्य सरकार देईल, या भरवाशावर पुणे महापालिका या कामासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यानुसार या कामासाठी निविदा काढली जाणार आहे.
शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जुलै २०२४ रोजी एकतानगर भागात अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सदनिका आणि दुकाने यांचे विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे.
त्यासाठीचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून सोबतच या भागासाठी ३०० कोटींचा आपत्ती निवारण निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे २६ जून २०२५ रोजी पाठविला आहे. त्यात पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवर विषयांकित भागाचा समावेश असलेला वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६ सुमारे ४.१० कि.मी. लांबीचा समावेश आहे.
पूर्वगणन पत्रकाला मंजुरी, आता निविदा
एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या भागातील इमारती व वस्त्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या पूर्वगणन पत्रकाला पूर्वगणना समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच निविदा काढली जाणार आहे.
२०२६ जूनपर्यंत काम पूर्ण
नदी सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा आहे. यामध्ये पथ-वे व जॉगिंग ट्रॅक करणे, वृक्ष लावणे, घाट विकसित करणे आदींचा समावेश आहे.
एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती अन् वस्त्यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल भागातील मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी निधी द्यावा, असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नमूद केले होते; अद्यापही सरकारकडून या कामासाठी पैसे आलेले नाही. त्यामुळे सरकार या कामासाठी पैसे देईल या भरवशावर महापालिका या कामासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यानुसार या कामासाठी निविदा काढली जाणार आहे.. त्यामुळे २०२६ च्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊ शकेल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.