मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:37 IST2025-03-25T10:37:07+5:302025-03-25T10:37:29+5:30
मुळशी तालुक्यात प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.

मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी
कोळवण : मुळशी तालुका हिरवाईने नटलेला, निसर्गसंपन्न, समृद्ध जैवविविधतेचा वारसा जपलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या मुळशी तालुक्यात ‘घनकचऱ्याची’ समस्या गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन गंभीर होत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन व विल्हेवाट यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी गंभिरतेने लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?
मुळशी तालुक्यात प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. चांदणी चौक सोडल्यावर बावधन, भूगाव, भुकूम, खाटपेवाडी, पिरंगुट घाट, कासार आंबोली, शिंदेवाडी, पौड घाट, सुसमार्गे आल्यावर सिम्बायोसिस हॉस्पिटलकडे जाणाऱ्या फाट्यापुढे नांदे गावापर्यंत रस्त्याच्या, घोटावडे फाटा ते घोटावडे गाव रस्ता आदी ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. आयटी नगरी हिंजवडी व परिसरात असेच दृश्य दिसून येते. पौड-कोळवण रस्त्यावरील मुळा नदीवरील पुलाच्या दोन्ही टोकास कचऱ्याचे मोठे ढीग दिसून येत आहेत.
खेड्यापाड्यातही कचरा उघड्यावर टाकलेला दिसतो. घनकचऱ्याचे हे लोन खेडोपाडीही पोहोचल्याचे दिसून येत आहे. कोळवण खोऱ्यातील वाढत्या पर्यटनासोबतच अनेक समस्यादेखील समोर येत आहेत, त्यातलीच एक मोठी समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन न होणे, कचरा व्यवस्थापनाची कसलीही व्यवस्था याठिकाणी उपलब्ध नाही, या परिसरातील कचरा हा नदीमध्ये किंवा रस्त्यांच्या कडेला पडलेला दिसतो; परिणामी माती, पाणी, हवा प्रदूषण होऊन निसर्गास धोका निर्माण होत आहे.
येत्या काळात हे असेच सुरू राहिले तर काही वर्षांतच निसर्गसंपन्नता संपुष्टात येईल व परिणामी पर्यटकदेखील पाठ फिरवतील. यामुळे कचरा संकलन, वर्गीकरण व पुनर्वापर प्रक्रिया अशी परिपूर्ण स्वतंत्र यंत्रणा या भागात असावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे स्थानिक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक व नागरिकांची आहे व प्लास्टिकचा वापरदेखील कमीत कमी होईल, अशा उपाययोजना कराव्यात. - समीर दुडे, नागरिक, कोळवण
घनकचऱ्याचा विषय हा गंभीर असून, यासाठी घनकचऱ्याचे संकलन व विल्हेवाटकरिता जागेची उपलब्धता ही महत्त्वाची अडचण आहे. याकरिता भविष्यात निरनिराळ्या पातळीवर चर्चा करून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न असेल. - सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मुळशी