दहावीचा पेपर संपल्यावर जुन्नर पोलिसांकडून हुल्लडबाज विद्यार्थ्यांवर कारवाई, २८००० रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:42 IST2026-03-19T16:41:59+5:302026-03-19T16:42:16+5:30
नुकत्याच झालेल्या घटनांमुळे, ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या व ओतूरमध्ये हत्याराने वार केले होते, त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दहावीचा पेपर संपल्यावर जुन्नर पोलिसांकडून हुल्लडबाज विद्यार्थ्यांवर कारवाई, २८००० रुपयांचा दंड वसूल
जुन्नर : इयत्ता दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर १८ तारखेला असल्याने, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अतिउत्साहामुळे होणारी संभाव्य हुल्लडबाजी, वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार आणि टिंगलटवाळीमुळे उद्भवणारी मोठी भांडणे यांच्या अटकावासाठी जुन्नर पोलिसांनी सर्व शाळांच्या परिसरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईचे शिक्षक आणि पालक वर्गाकडून स्वागत होत आहे. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या संकल्पनेतून ही कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या घटनांमुळे, ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या व ओतूरमध्ये हत्याराने वार केले होते, त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
जुन्नर पोलिसांनी शेवटच्या पेपरच्या दिवशी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, अण्णासाहेब आवटे विद्यालय, कृष्णराव मुंडे विद्यालय आणि अंजुमन विद्यालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त लावला होता. शालेय परिसरात फिरता बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. या खबरदारीमुळे हुल्लडबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आळा बसला आहे आणि विद्यार्थ्यांवर पोलिस बंदोबस्तामुळे धाक राहिला आहे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयापासून रोकडे मारुती मंदिरापर्यंत, तसेच माणिकडोह चौकापर्यंत, कृष्णराव मुंढे विद्यालयापासून नंदनवन सोसायटीपर्यंत, तसेच अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर परिसरात फिरता पोलिस बंदोबस्त राहिला.
रोकडे मारुती मंदिराजवळ पोलिसांचा पिंजरा उभा करण्यात आला होता. अल्पवयीन, विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण १८ पावत्यांवर २८,००० रुपयांचा दंड करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅगची तपासणी करताना चार विद्यार्थ्यांकडे फायटर, पीव्हीसी पाइप, आदी साहित्य आढळले. या विद्यार्थ्यांना, तसेच त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.
आर. सी. बी. पथक क्रमांक दोन, डी. एम. वनवे, कैलास केंद्रे, विशाल चौधरी, तसेच इतर पोलिस पथकांनी ही कारवाई केली. "शेवटचा पेपर संपल्यावर शालेय विद्यार्थ्यांकडून उत्साहामुळे काही अनुचित प्रकार घडतील अशी शक्यता असते," असे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले. पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी, तसेच चारचाकी वाहन देऊ नये; अन्यथा पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेल.