स्मार्ट आरोग्य केंद्राचा फक्त नावापुरता गाजावाजा? मोरगावात पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:43 IST2026-03-21T15:43:31+5:302026-03-21T15:43:44+5:30
या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

स्मार्ट आरोग्य केंद्राचा फक्त नावापुरता गाजावाजा? मोरगावात पाणीटंचाई
मोरगाव : राज्यातील प्रमुख तीर्थस्थान आणि अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्मार्ट आरोग्य केंद्र म्हणून निवड करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात येथील अनेक गैरसोयी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. पिण्यासह वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसणे, तसेच दिवस-रात्र स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत बारामती तालुक्यात दोन स्मार्ट पीएचसींची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये मोरगाव आणि होळ या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. मोरगाव येथील आरोग्य केंद्र ज्या इमारतीत पूर्वी सुरू होते त्या संपूर्ण इमारतीचे लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप येथे पूर्णपणे कामकाज सुरू झाले नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करणे किंवा इतर वैद्यकीय सेवा देणे गैरसोयीचे ठरत आहे.
शासनाकडून मंजूर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानेही आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील आठ उपकेंद्रांचा समावेश आहे. मात्र, केंद्राच्या आवारात पिण्यासाठी मुबलक पाणी नसणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राच्या इमारतीपासून काहीच अंतरावर ग्रामपंचायतीची मोठी पाण्याची टाकी असतानाही येथील वापरासाठी पाणी अपुरे पडत असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे प्रलंबित आहे..
दिवस-रात्र सुरक्षा रक्षकाची मागणी
आरोग्य केंद्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच निवासी स्वरूपात राहणाऱ्या सेवकांमध्ये महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक वेळा परिसरातील काही व्यक्ती मद्य प्राशन करून येथील कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. गावात यापूर्वी काही गंभीर घटना घडल्याने जिल्हा परिषदेकडून येथे दिवस-रात्र सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थ आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.