पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
By किरण शिंदे | Updated: January 20, 2026 10:05 IST2026-01-20T09:59:20+5:302026-01-20T10:05:03+5:30
पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही.” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला.

पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
पुणे - “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी रहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा,” असा थेट आणि परखड सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. चाकण येथे पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
एमआयडीसीत गेलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. ‘बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ’ असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही.” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे नमूद करत अजित पवारांनी, “धंदा-पाणी सांभाळा, आयुष्य नीट जगा,” असे आवाहन केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यातील बारामती होस्टेल येथे काही इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्याचे समजते. आतापर्यंत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असून, ते कायम ठेवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा गड तरी राखला जावा यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.