आळंदी व देहू पालखी मार्गावरील कामे १५ मे अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:20 IST2026-02-24T15:18:59+5:302026-02-24T15:20:56+5:30
आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

आळंदी व देहू पालखी मार्गावरील कामे १५ मे अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आळंदी : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदी पालखी मार्गावरील सर्व विकासकामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेत सर्व प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी अनिल दौंडे, देहू संस्थानचे विश्वस्त गणेश मोरे आणि आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देहू ते देहू रोड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्ते रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपापल्या हद्दीतील कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्वतः पाठपुरावा करणार आहे. तसेच देहू येथील मंदिरापर्यंतचा ५०० मीटरचा रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण केला जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे असतो, मात्र तेथे जागेची अडचण असल्याने तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त पाहणी केली जाईल. काळभोर नगर ते आकुर्डी दरम्यानचे मेट्रोचे काम पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवून देण्यात येणार असून, गवळ्याची उंडवडी, सणसर आणि निमगाव केतकी येथील मुक्कामाच्या जागेचे प्रश्नही प्रशासनामार्फत सोडविले जातील.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर संचेती रुग्णालय ते एफ.सी. रोडपर्यंत रात्रीच्या वेळी अखंडित प्रकाश व्यवस्था राहील, याची खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बोरावके मळा ते सासवड दरम्यानच्या नवीन बायपास मार्गावरील अडथळे दूर करून दिवेघाटात आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारले जातील. पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावर कोणतीही वाहने बंद पडल्यास वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून सोबत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. या बैठकीत नीरा येथील जुना पूल तातडीने पाडण्याचे आदेश देण्यात आले असून, आळंदी नगरपालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण आणि प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वारीच्या परतीच्या प्रवासातही भाविकांसाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.