काँग्रेसने बारामती पोटनिवणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:26 IST2026-04-05T13:25:40+5:302026-04-05T13:26:05+5:30
- जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसने बारामती पोटनिवणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपल्या पक्षाची इच्छा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडायला हवा. याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्यात, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. तसेच जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी दुपारी पुण्यात झाली. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमहापौर परशुराम वाडेकर, आरपीआयचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस आशा लांडगे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, नगरसेवक नीलेश आल्हाट आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपाबद्दल चर्चा करण्यात आली. यानिमित्त रिपब्लिकन पक्षाकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाड येथील सत्याग्रह या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने समता परिवर्तन यात्रा १४ ऑक्टोबरला सातारा येथून सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.