पुण्यात मेट्रोचे २०० किलोमीटर जाळे उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 19:06 IST2026-03-15T19:04:12+5:302026-03-15T19:06:13+5:30
पुण्यातील ‘मेट्रो भवन’च्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यात मेट्रोचे २०० किलोमीटर जाळे उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे :पुणे हे देशातील अत्यंत वेगाने वाढणारे शहर असून, येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. भविष्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात एकूण २०० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे उभारण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुण्यातील ‘मेट्रो भवन’च्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येईल, ज्यामुळे पुणेकरांचा मोठा प्रवास सुखकर होईल. हा मार्ग सुरू झाल्यानंतर शहरात जवळपास ५५ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यान्वित असतील. याशिवाय, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत आणखी ५५ किलोमीटरच्या मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त ८० किलोमीटरचे अतिरिक्त नियोजन असून, भविष्यात एकूण २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभे करण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे. मेट्रो प्रशासनाने आता टप्प्या-टप्प्याचे नियोजन न करता संपूर्ण क्षेत्राचा एकत्रित आराखडा तयार करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक ‘भवन’ : सुनेत्रा पवार
पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
गॅसचा तुटवडा नाही, काँग्रेस अफवा पसरवतेय
अमेरिका इस्त्रायल आणि इरणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुण्यासह राज्यात सिलिंडरसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले, देशात किंवा राज्यात कुठेही गॅसचा तुटवडा नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅस एजन्सीबाहेर रांगा लावू नयेत आणि गर्दी करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.