माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:59 IST2025-07-30T09:58:50+5:302025-07-30T09:59:13+5:30
या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम
घोडेगाव : ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाजासह चिखलाचा लोंढा गावावर धडकला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.
दुर्घटनेनंतर शासनाने मयतांच्या वारसांना भरघोस मदत केली, तसेच विविध सामाजिक संस्थांनीही हातभार लावला. अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन पूर्ण झाले. नवीन माळीण गावात ६८ घरे बांधण्यात आली असून, सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावकरी आता स्थिरावले असून, शेतीसह इतर व्यवसायात गुंतले आहेत. काहींनी जनावरे पाळली, तर काहींनी गरजेनुसार शासनाने दिलेल्या घरांजवळ घरे वाढवली आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डिंभे धरण, आहुपेचे उंच कडे, भीमाशंकरचे जंगल आणि पाटण खोरे यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. माळीण आता पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास आले आहे. अनेक पर्यटक जुन्या माळीणच्या दुर्घटनास्थळाला आणि नवीन पुनर्वसित गावाला भेट देण्यासाठी येतात.
गावकरी टँकरवर अवलंबून
नवीन माळीणमध्ये सर्व सुखसोयी असल्या, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उन्हाळ्यात गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गावकरी विजय लेंभे म्हणाले, “पाणी योजना आणि बुब्रा नदीत बंधारा बांधूनही ठोस उपाय निघाला नाही. पाण्याचा प्रश्न सुटावा, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
नवीन गावात कमल लेंभे यांना घर मिळाले नाही. त्यांचे जुन्या माळीणमधील घर सामायिक होते आणि नवीन घराची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात झाली नव्हती. त्यांच्या दिराला घर मिळाले, पण कमल यांना शासनाने घरकुल मंजूर केले तरी जागेअभावी त्या अजूनही तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात - कमल लेंभे ग्रामस्थ
स्मृतीस्तंभावर अभिवादन
३० जुलै २०२५ रोजी जुन्या माळीण येथील स्मृतीस्तंभावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहतील. गावकरी आपल्या जुन्या घरांच्या ठिकाणी नैवेद्यपूजा करणार आहेत. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने स्मृतीस्तंभावर शेड बांधण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी
कमाजी पोटे यांनी त्या भयंकर प्रसंगाची आठवण सांगितली, “रात्रभर पाऊस पडत होता. पाणी जमिनीत खोलवर मुरले, जमिनीचा श्वास गुदमरला आणि डोंगर खचला. दगड, झाडे, चिखलाचा लोंढा गावावर आला. माझे घर डोळ्यासमोर गाडले गेले. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.” अमोल अंकुश म्हणाले, “नवीन माळीण टुमदार वसले आहे. स्मृतीस्तंभावर शेड बांधले गेले, पण पाण्याचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे.”