पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा; २७ गावं, १२९ वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:49 IST2021-05-07T17:48:23+5:302021-05-07T17:49:31+5:30
निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही....

पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा; २७ गावं, १२९ वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा
पुणे : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाईसुरु झाली आहे. जिल्ह्यातील २७ गावे आणि १२९ वाड्या वस्त्यांवर 46 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ३७ हजार १७२ हजार नगरिकांना याचा लाभ मिळत आहे.
निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र एप्रिल मे महिन्यात उन्हाची दाहकता अनुभवायला येत आहे. दुर्गम तसेच अवर्षणप्रवण परिसरात जलस्रोत आटले आहेत. यामुळे त्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. धरणांतून सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाण्याची पातली घटली आहे. परिणामी जिल्ह्यातील २७ गावात आणि १२९ वाड्या वस्त्यांवर ४६ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षीच्या विचार केल्यास सध्या जिल्ह्यात सुरू असलेली टँकरची संख्या ही तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश मिटवण्यासाठी जळजीवन मिसजन अंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यात पाणीटंचाई कमी करण्यासाठी तलाव खोदणे, विंधन विहिरी खोदणे गाळ उपसने, नळ पाणी पुरवठा योजना राबविणे अशी कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.
.........
सर्वाधिक टँकर आंबेगाव तालुक्यात
यंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली आहे. आंबेगाव, भोर, हवेली, खेड, जुन्नर या चार तालुक्यातील काही गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.