विद्यार्थ्यांनो तयारीला लागा..!बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला, तर दहावीची २० फेब्रुवारीला हाेणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:55 IST2025-11-01T18:55:00+5:302025-11-01T18:55:17+5:30
- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले वेळापत्रक

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा..!बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला, तर दहावीची २० फेब्रुवारीला हाेणार सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा राज्यात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू हाेणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार असून, त्याचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता बारावी :
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान हाेणार आहे. तत्पूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) दि. २३ जानेवारी ते ०९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
इयत्ता दहावी :
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान हाेणार आहे. तत्पूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक) दि. २ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हाेणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
छापील वेळापत्रक असेल अंतिम :
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या वरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.